सातारा : शासकीय, निमशासकीय, कंत्राटी, नगरपंचायत अंशकालीन रोजंदारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह विविध मागण्यांसाठी 29 ऑगस्ट रोजी पुन्हा बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा सातारा जिल्हा समन्वय समितीचे निमंत्रक नेताजी दिसले यांनी दिला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.
ते म्हणाले, जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात शासनाने समिती नेमूनही त्याबद्दलचा स्वयंस्पष्ट निर्णय दिलेला नाही. अद्याप जुन्या पेन्शन योजनेसाठी शासनाकडून चालढकल होत आहे. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात शासनाने मार्गदर्शन करावे, नवीन पेन्शन योजना रद्द करून ती जुनी लागू करावी, कंत्राटी योजना कामगार प्रदीर्घकाळ सेवेत असताना समान वेतन कायदा देऊन त्यांची सेवा नियमित करावी, निवृत्तीचे वय 60 करावे, नवीन शिक्षण धोरण रद्द करावे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवांतर्गत प्रश्न तात्काळ सोडवावेत, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची सध्या रोखलेली पदोन्नती तत्काळ सुरू करावी, वय 80 ते 100 या वयातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी केंद्र शासनाने विहित मासिक पेन्शनमध्ये वाढ करावी, कामगार, कर्मचारी, शिक्षकांच्या हक्कांचा संकोच करणारे कामगार कायद्यातील मालकधार्जिणे धोरण रद्द करावे, शिक्षण सेवक, ग्रामसेवक यांना मिळणाऱ्या मानधनात वाढलेल्या महागाईचा विचार करून वृद्धी करण्यात यावी, अशा विविध मागण्या दिसले यांनी केल्या आहेत.
या संदर्भात शासकीय कर्मचारी संघटना समन्वय समितीने मार्च 2023 व डिसेंबर 2023 यामध्ये बेमुदत बंदची हाक देऊन शासकीय कर्मचाऱ्यांची ताकद दाखवून दिली होती. मात्र शासनाने अद्याप कोणत्याही निर्णयासंदर्भात ठोस भूमिका न घेतल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्मचारी व शिक्षकांमध्ये संतापाची लाट आहे. या मागण्यांच्या आग्रहासाठी समन्वय समितीने पूर्ण शक्तीने संघर्ष करण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी, शिक्षक, शासकीय कर्मचारी दिनांक 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाऊन याबाबतचा रोष व्यक्त करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचाऱ्यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा
29 ऑगस्ट पासून होणार बेमुदत धरणे आंदोलन
by Team Satara Today | published on : 27 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा