विद्रोही तर्फे यंदाही वारकर्‍यांसाठी आरोग्य शिबिर

by Team Satara Today | published on : 20 June 2025


सातारा : वारकरी परंपरा ही समतेची परंपरा आहे. जातिभेद, स्त्री-पुरुष विषमता न मानणारी परंपरा आहे. मध्ययुगात ज्ञानाची मक्तेदारी मोडून बहुजनांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणारी वारकरी परंपरा ही विद्रोही परंपरा आहे. हे सर्व लक्षात घेऊन वारकर्‍यांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच दरवर्षी वारकर्‍यांसाठी मोफत आरोग्य शिबिर चिंचणी टप्पा (सोलापूर) व इंदापूर (पुणे) येथे जगद्गुरु तुकोबाराय व संत ज्ञानोबा माऊली यांच्या पालखी सोहळ्यात विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित केले जाते. यंदाही वारकर्‍यांसाठी विद्रोही तर्फे मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे, अशी माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे प्रवक्ते विजय मांडके व उपाध्यक्ष प्रा. गौतम काटकर यांनी दिली.

विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्या वतीने 21 वर्षापासून अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये वारकर्‍यांसाठी सोलापूर जिल्ह्यातील चिंचणी टप्पा येथे आरोग्य शिबिर घेत असतो. गेल्या दहा वर्षापासून पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे वारकरी आरोग्य शिबिर घेत आहोत. यंदा चे हे वर्ष 11वे आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दि 29 जून 2025 रोजी इंदापूर येथे आहे. त्या दिवशी वारकरी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती वारकरी आरोग्य शिबिराचे समन्वयक महेश गुरव, शिवराम ठवरे व राहुल गंगावणे यांनी दिली.

वारकरी आरोग्य शिबिरात तज्ञ डॉक्टर तपासणी करूनच औषध देत असतात. वारकर्‍यांना प्रामुख्याने डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी, पाठदुखी, डोळ्याचे विकार, जुलाब, स्नायूदुखी, ताप, थंडी, खोकला अशा प्रकारचे आजार उद्भवत असतात. यावरील औषधे, टॅबलेट, इंजेक्शन वारकर्‍यांना दिली जातात. यासाठी आर्थिक तसेच औषधांच्या स्वरूपात मदत देऊन सहकार्य करावे, असे आवाहन विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्या सातारा जिल्हा शाखेच्या वतीने शुभम ढाले, रश्मी लोटेकर, स्वप्नाली भोसले, संकेत माने, अमित कांबळे इत्यादी कार्यकर्त्यांनी केले आहे.्

इंदापूर येथील राष्ट्रसेवादल, संभाजी ब्रिगेड, अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनांचे कार्यकर्ते या आरोग्य शिबिरासाठी सहकार्य करीत असतात.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नियुक्ती
पुढील बातमी
पालिकेच्या अभय योजनेला मुदतवाढ मिळावी

संबंधित बातम्या