सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीदरम्यान जो राजकीय गोंधळ झाला, त्याचे सभागृहाच्या बाहेरील आवारातील कोणतेही सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे एक पत्र सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाले असून, त्यामध्ये इमारतीत सुरू असलेल्या पीओपीच्या कामामुळे बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या या भूमिकेमुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कायदेशीर दाद मागण्याच्या प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. कायदेशीर याचिकेमध्ये पुरावा म्हणून या राड्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखल केले जाणार होते, मात्र आता त्याला ब्रेक बसला आहे. २० मार्च २०२६ रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेदरम्यान सातारा पोलिसांनी अनिल देसाई व संदीप मांडवे या दोन सदस्यांना अटक केली होती. यावेळी कॅबिनेट मंत्र्यांनाही धक्काबुक्की झाल्याची चर्चा थेट विधिमंडळात झाली होती आणि त्याचे पडसाद कामकाजातही उमटले होते. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ ताब्यात देण्यात यावेत, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली होती.
मात्र, प्रत्यक्षात कॅमेरे बंद असल्यामुळे हे चित्रीकरण होऊ शकले नसल्याची बाब समोर आली आहे. व्हायरल झालेल्या पत्रात सीसीटीव्हीच्या वायर्स तुटल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. जिल्हा परिषद इमारतीत पीओपीचे काम सुरू असल्यामुळे ही यंत्रणा बंद पडल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत हा गोंधळ घडवून आणायचा होता म्हणूनच जाणीवपूर्वक पीओपीचे काम काढले गेले आणि त्यानिमित्ताने सीसीटीव्ही यंत्रणा बंद पाडण्यात आली, जेणेकरून पुरावे शिल्लक राहणार नाहीत, असा गंभीर आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.