संगम माहुली पूल पडण्याची प्रशासन वाट पाहत आहे का?

पुलाला 100 वर्षे उलटून, 110 वर्ष पुर्ण

by Team Satara Today | published on : 16 June 2025


सातारा : आज मावळ येथील इंद्रायणी नदी वरचा जुना पूल बांधकामाचे मुदत संपले असले कारणाने व त्याकडे दुर्लक्ष केले असल्यामुळे पडला. त्यात  प्रथमदर्शनी 4 ते 5 जण मृत्यू पावले आणि असंख्य लोक जखमी झाले आहेत असे समजते.

सदर ठिकाणी नवीन पूल बांधण्यासाठी 8 कोटी बरेच दिवसापूर्वी मंजूर झाले पण काम झाले नाही असेही समजले. ही बाब गंभीर आहे.

आपल्या सातारा कोरेगाव रस्त्यावर कृष्णा नदीवर बांधलेला पूल याला 110 वर्ष झाली आहेत. त्या ठिकाणी नवीन पूल बांधण्यासाठी टेंडर 3,4 वर्षापूर्वीच काढण्यात आले आणि पुलाचे काम सुद्धा सुरू झाले आहे. 

पण सदर काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असून 3 वर्षात फक्त 1 च पिलर उभा झाला आहे. असेच काम धिम्या गतीने झाले तर पुलाचे पूर्ण काम होण्यासाठी अजून 5,10 वर्ष लागतील.

सदर माहुली येथील पुलाला 100 वर्ष पूर्ण झाले असून बांधकामाची मुदत संपली आहे. असे ब्रिटिश सरकार असताना पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीने महाराष्ट्र सरकारला लेखी कळवले आहे असे समजते.

याचा अर्थ सदर माहुलीच्या बांधकामाची मुदत संपून 10 वर्ष झाली आहे. तेव्हा कधीही पुलाला धोका निर्माण होऊ शकतो आणि अपघात होऊ शकतो.

असे झाले तर सातारा जिल्ह्यातील पूर्व भागाचा पूर्ण संपर्क तुटू शकतो. तसेच दुर्दैवाने होणारी मानवी हानी आणि आर्थिक नुकसान होईल यात शंका नाही. त्या नंतर पेपर ला बातम्या येतील, कोणावर तरी गुन्हे दाखल होतील, पण होणारी जिवीत हानी आणि आर्थिक नुकसान कधीच भरून येणार नाही.

म्हणून एखादी वाईट घटना घडण्याची वाट बघण्यापेक्षा ती घडूच नाही म्हणून प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत.

यासाठी प्रशासनाने प्राधान्य देऊन माहुली येथील पुलाचे बांधकाम करणेसाठी नेमलेल्या ठेकेदाराकडून लवकरात लवकर आणि दर्जेदार कसे होईल याची जबाबदारी घेतली पाहिजे, आणि भविष्यात होणारा अपघात व नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ही नम्र विनंती.

राजेंद्र चोरगे 

श्री बालाजी ट्रस्ट सातारा


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आषाढी वारीतील दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान; शासन निर्णय जारी
पुढील बातमी
आता शाळा-महाविद्यालयांमध्येच एसटी प्रवास पासची सुविधा

संबंधित बातम्या