भंडाऱ्याच्या उधळणीत पालचा रथोत्सव

‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने पाल नगरी दुमदुमुली

by Team Satara Today | published on : 13 January 2025


सातारा  : पाल (ता. कराड) येथे महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री खंडोबा व म्हाळसाकांत विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला. येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट अशा जयघोषाने पाल नगरी दुमदुमुन गेली. या विवाह सोहळा पार पाडण्यासाठी लाखो भाविक सहभागी झाले होते.

महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र या राज्यातून आलेल्या भाविकांनी दक्षिण वाळवंटात भाविकांनी गर्दी केली होती. यात्रेच्या मुख्य दिवशी वाळवंटात वाघ्या-मुरळी या नाचताना दिसत होत्या. परंपरेनुसार दुपारी एक वाजण्याच्या सुमारास देवस्थान ट्रस्टने बनवलेल्या स्वःमालकीच्या राजेशाही रथातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांच्या वाड्यापासून मिरवणुकीस सुरुवात झाली. या सोहळ्यासाठी मानकरी, वऱ्हाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

फुले, तोरणे यांनी सजवलेल्या बैलगाड्यांतून श्री खंडोबाची वऱ्हाडी मंडळी तारळी नदीपात्राकडे जाण्यासाठी निघाली. प्रत्येक वऱ्हाडी मंडळीच्या पुढे वाद्यवृंद वाजवत ही मंडळी येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदचा येळकोट असा गजर करीत सर्व मानकरी व कारखाना मंदिराकडे तीन वाजण्याच्या दरम्यान रवाना झाले. या वेळी देवाचे मुख्य मानकरी देवराज पाटील यांच्याकडे पुजाऱ्यांनी विधिवत पूजा करून खंडोबा व म्हाळसा यांच्या मूर्ती दिल्या. यानंतर भव्यदिव्य अशा रथामध्ये विराजमान होत श्री खंडेराया व म्हाळसा यांचे मुखवटे पोटाला बांधून प्रमुख मानकरी देवराज पाटील रथात विराजमान झाले. या वेळी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून मिरवणूक बाहेर येताच जमलेल्या लाखो भाविकांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट’ असा जयघोष केला.

यानंतर सर्व मानकरी व कारखाना यांच्यासह शाही मिरवणूक वाळवंटात आली. यावेळी लाखो भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले. भंडारा व खोबऱ्याची रथावर उधळण करत मिरवणूक हळूहळू लग्न मंडपाकडे रवाना झाली. गोरज मुहूर्तावर तिन्ही सांजेच्या अगोदर विवाह मंडपात पोचली. नंतर बाहूल्यावरती वऱ्हाडी मंडळीचा मानपानाचा विधी उरकण्यात आला. सायंकाळी पावणेसहा वाजता गोरज मुहूर्तावर श्री खंडोबा व म्हाळसा विवाह सोहळा पार पडला. या वेळी भंडारा व खोबऱ्यांची उधळण करीत पालनगरी दुमदुमली.

प्रशासकीय यंत्रणा, ग्रामपंचायत, यात्रा कमिटी, देवस्थान ट्रस्ट यांनी यात्रेची तयारी चांगल्या पद्धतीने केली असल्याचे दिसून आले. यात्रेकरूंसाठी स्वच्छ व मुबलक पाणी, स्वच्छतागृहे आदी सोयी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी उंब्रज, सातारा, कराड, पाटण येथून एसटी महामंडळाने जादा बसची सोय केली होती, तर शिरगाव, हरपळवाडी मार्गावर खासगी वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली होती.

प्रशासनाच्या वतीने यात्रा काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखली जावी, यासाठी जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आपत्कालीन दक्षता म्हणून जिल्हा प्रशासनाचे आपत्कालीन पथक, अग्निशामक दलाची पथके, आरोग्यविभाग पथके, रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली होती, तर आपत्कालीन उपयोगासाठी पाल-वडगाव-इंदोली मार्ग पूर्णता मोकळा ठेवण्यात आला होता. या वेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे व कर्मचारी, तसेच पोलिस पाटील, देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी, स्वयंसेवक यांनी यात्रेचे नीटनेटके नियोजन करून यात्रा सुरळीतपणे पार पडली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मकरसंक्रांती निमित्त "गोविंद पार्क" देत आहे फ्लॅट बुकिंग वर "होंडा ॲक्टिवा" !
पुढील बातमी
महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार

संबंधित बातम्या