सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून निघालेल्या मुंबईतील विद्यार्थ्यांच्या लक्झरी बसला आनेवाडी टोलनाक्याजवळ भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने बसमधील मुला-मुलींना तातडीने बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.
मुंबईत शिक्षण घेणारी मुले आणि मुली लक्झरी बसने पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून सातारकडे येण्यासाठी निघाली होती. ही मुले सातारा तालुक्यातील चाळकेवाडी येथील सुझलॉन कंपनीत प्रोजेक्टसाठी येत होती. त्यादरम्यान आनेवाडी टोलनाक्याजवळ आल्यावर बसच्या पाठीमागील भागात आग लागल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. यानंतर चालकाने बस सर्विस रस्त्यावर वळवली. त्या बसमधील मुला-मुलींना बसमधून खाली उतरण्यास सांगितले.
लक्झरी बसला भीषण आग लागल्याने मुले भयभीत झाली. हातात येतील तशा बॅगा व बसमधील इतर साहित्य घेऊन मुले काही मिनिटात बसमधून खाली उतरली. काही नागरिकांनी तातडीने या घटनेची अग्निशामक दलाला माहिती दिली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोचून आग आटोक्यात आणली. या आगीत बसमधील सीट जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.
जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विकास धस व भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी मुलांसाठी दुसरी लक्झरी बस उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर मुले चाळकेवाडी कडे आपल्या प्रोजेक्टसाठी रवाना झाली आहेत.