स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानच्या वतीने महाराणी ताराबाई यांच्या समाधीला वज्रलेप

ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी दोन लाखाची पदरमोड; समाधी स्थळ साकारण्यासाठी सातारकरांना केले आवाहन

by Team Satara Today | published on : 28 March 2025


सातारा : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मंदिर वज्रलेपासाठी प्रसिद्ध असलेल्या गौरव घोडे यांच्या श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानच्यावतीने माहुली येथील मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई यांच्या समाधीचे वज्रलेप प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेमुळे या समाधीच्या चिरांचे आयुष्य 50 वर्षांनी वाढले आहे. या उपक्रमासाठी घोडे यांनी वैयक्तिक दोन लाखाची पदरमोड केली आहे. या प्रतिष्ठानच्या वतीने ताराबाईंच्या समाधीची महाआरती आणि विशेष पूजा करण्यात आली. सातारकरांनी पुढाकार घेऊन महाराणी ताराबाई यांच्या समाधी स्थळासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन घोडे यांनी केले आहे.

मोगल मर्दिनी महाराणी ताराबाई यांचे निधन इसवी सन 1761 मध्ये सातार्‍यात अजिंक्यतारा किल्ल्यावर झाले. त्यांची समाधी संगम माहुली येथे बांधण्यात आली होती. मात्र त्या समाधीच्या दगडी रचना माहुली येथे एका ठिकाणी उघड्या स्वरूपात ठेवण्यात आल्या होत्या. गेल्या पंधरा वर्षात या समाधीच्या संवर्धनाचे व जीर्णोद्धाराच्या आश्वासनांचे फुगे अनेकदा हवेत उडाले प्रत्यक्षात काहीच झाले नाही. मात्र कृष्णा नदीच्या पात्रात वाळूत गाडली गेलेली समाधी काही संघटनांच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा चर्चेत आली. बांधकाम मंत्री आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुद्धा या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासंदर्भात सुतोवाच केले होते. प्रसार माध्यमांनी या समाधीच्या दुरावस्थेविषयी सुद्धा आवाज उठवला होता. मात्र या संदर्भात पुढे कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत.

ही माहिती गौरव घोडे यांच्या कानावर गेल्यावर त्यांनी तातडीने आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून माहुली येथे येऊन या समाधीच्या दगडी चिरांना वज्रलेप केला आणि या समाधीच्या चिरांचे आयुष्य आणखी 50 वर्षांनी वाढवले. मूळचे बारामतीचे, पण पुण्यात स्थायिक झालेले गौरव घोडे हे प्राचीन मंदिर, पुरातन समाधी यांच्या जीर्णोद्धाराचे आणि संवर्धनाचे काम गेल्या वीस वर्षापासून करतात. त्यांनी आतापर्यंत कर्नाटकातील महिलापूर मध्ये तुपाशीह मल्ल्याला, वीरभद्रेश्वर आणि हेगडे प्रधानमंत्री नूतनीकरण कार्य केले आहे. पुणे येथील ओढा कॉलनीत सामान्य कुटुंबात घोडे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील, आजी कुटुंबीय जेजुरी येथील मल्हारी मार्तंड खंडोबाची नित्य सेवा करतात. आजारपणात स्वामींनी खंडोबा रूपात दर्शन व भंडारा दिल्याने अंथरुणाला खिळलेली त्यांची आई ठणठणीत बरी झाली. वडिलांनी श्री स्वामी ओम मल्हारी या मंत्राचा जप करण्यास सुरुवात केली. याच गोष्टीपासून प्रेरणा घेऊन गौरव घोडे यांनी मंदिर संवर्धनाचे आणि संगोपनाचे काम सुरू ठेवले आणि प्रतिष्ठानचे त्याच नावाचे नामकरण केले. घोडे मंदिराचा वज्रलेप हे नि:स्वार्थ आणि विनामूल्य करतात. महाराणी ताराराणी यांच्या समाधीला वजलेप करण्यासाठी त्यांनी वैयक्तिक दोन लाख रुपये खर्च केला आहे. प्रतिष्ठानच्या वतीने या समाधीचा वजलेप झाल्यानंतर समाधीची विशेष पूजा बांधण्यात येऊन आरती करण्यात आली. राजघराण्यातील मान्यवर सदस्य तसेच इतिहास प्रेमी समग्र सातारकर यांनी पुढे येऊन महाराणी ताराबाई यांच्या समाधी स्थळासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन गौरव घोडे यांनी केले आहे. छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे यांची कर्नाटक राज्यातील होदेगिरी येथे समाधी आहे. या समाधीला सुद्धा आपण विनामूल्य वज्रलेप करणार असल्याची घोषणा घोडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम
पुढील बातमी
कापडगावची खताळ टोळी दोन वर्षासाठी तीन जिल्ह्यातून हद्दपार

संबंधित बातम्या