कराड : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेला राजीनामा हा लोकशाहीचा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, "धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे खरंतर लोकशाहीचा प्रचंड मोठा विजय आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो स्वीकारला आहे की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तसेच त्या खात्याची जबाबदारी पर्यायाने कोणाकडे सोपविण्यात येणार आहे, हेही अद्याप जाहीर झालेले नाही."
ते पुढे म्हणाले, "NEET आणि CBSE संदर्भातील प्रश्नांवर देशभरातील विद्यार्थी, युवक आणि पालकांनी सातत्याने आवाज उठवला. विरोधी पक्षांनीही या प्रश्नावर एकजुटीने भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे हा केवळ एका मंत्र्याचा राजीनामा नसून विद्यार्थी शक्ती, युवा शक्ती आणि विरोधी पक्षांच्या एकजुटीचा मोठा विजय आहे."
या घडामोडीचे वर्णन एका वाक्यात करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, हीच अखेरची सुरुवात आहे. या निर्णयामुळे शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्व अधिक मजबूत होईल आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारला अधिक गांभीर्याने पाहावे लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.