सातारा : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘मतचोरी’वरून निवडणूक आयोगाला घेरले आहे. काँग्रेसच्या वतीने देशभरात ‘वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ हू’ या उपक्रम सुरू केला आहे. साताऱ्यात जिल्हा काँग्रेस भवनातून जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.
राहुल गांधी यांनी नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाने लोकसभा व महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकीत मतदार नोंदणीत गैरप्रकार करीत प्रत्यक्ष मतमोजणीत मतचोरी केल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपानंतर देशभर सर्व विरोधकांनी एकजूट दाखवत रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेत आंदोलन केले.
निवडणूक आयोगाविरुद्ध विविध उपक्रमांद्वारे आंदोलन छेडण्याचा निर्णय झाल्यानंतर ‘वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ हू’ या अंतर्गत स्वाक्षरी मोहीम जिल्हावार सुरू करण्यात आली. काँग्रेस भवनात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या मोहिमेला जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी सुरुवात केली. याप्रसंगी बाबूराव शिंदे, अल्पसंख्याक सेलचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष झाकिर पठाण, सरचिटणीस राजेंद्र शेलार, संजय तडाखे, रजिया शेख, बाबासाहेब कदम आदी उपस्थित होते.