अन्न व औषध प्रशासन कार्यालयात रॅम्प नसल्याची तक्रार

सातार्‍यात दिव्यांग बांधव आक्रमक : बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा

by Team Satara Today | published on : 04 August 2026


सातारा : सातारा येथील अन्न भेसळ (अन्न व औषध प्रशासन) कार्यालयात दिव्यांगांसाठी रॅम्प व व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध नसल्याचा गंभीर आरोप करत संबंधित अधिकार्‍यांवर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, शहर पोलीस ठाणे तसेच पुणे व सातारा येथील दिव्यांग सक्षमीकरण अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदन देताना दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अजय पवार, शैलेंद्र बोर्डे, अमोल निकम, अमोल भातुसे, पांडुरंग शेलार, नितीन शिंदे, धर्मेंद्र कांबळे, विकी भंडारी, बाळू ओवाळ, दत्ताभाऊ बोराटे, संतोष विभुते, हरिभाऊ साळुंखे, संतोष भोसले, सुप्रिया जाधव उपस्थित होते.

निवेदनात असा दावा करण्यात आला आहे की, अन्न भेसळ (अन्न व औषध प्रशासन) कार्यालयात दोन दिव्यांग कर्मचारी कार्यरत असूनही अद्याप दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. तसेच कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिव्यांग व्यक्तींशी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आणि धमकी दिल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकार्‍याला तात्काळ निलंबित करावे आणि कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

याच निवेदनात सातारा जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. गुटखा जिल्ह्यात नेमका कुठून येतो, त्यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे, याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात कोणत्याही शासकीय यंत्रणेतील व्यक्तींचा सहभाग असल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास 5 ऑगस्टपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तसेच अन्न व औषध प्रशासन कार्यालयाबाहेर दररोज बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. तसेच 14 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयापासून पालकमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत लोटांगण आंदोलन करण्यात येणार असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी जाहीर केले आहे.

आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिलेली ही नोटीस भविष्यात न्यायालयात कायदेशीर पुरावा म्हणून सादर करण्यात येईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांना विरोध दर्शवला त्यांनी आम्हाला संविधानावर लेक्चर देऊ नये ; अभिजीत दिपकेंनी संघाला सुनावलं
पुढील बातमी
यादोगोपाळ पेठेतील पाणीटंचाईवरून नागरिकांचा उद्रेक

संबंधित बातम्या