कास धरणाची सुरक्षा व्यवस्था पुन्हा रामभरोसे

पाण्यात बुडण्याच्या दुर्दैवी घटना रोखणार कशा ? दोन नळकर्‍यांवर एकशे चाळीस हेक्टर ची सुरक्षा व्यवस्था

by Team Satara Today | published on : 18 May 2025


सातारा : सातारा शहराची तसेच तालुक्यातील सोळा गावांची वर्षभर पाण्याची तहान भागवणार्‍या कास तलावाची सुरक्षा व्यवस्था एका दुर्दैवी घटनेने अधोरेखित झाली आहे. नऊ वर्षाच्या राकेश विश्वकर्मा या मुलाचा कास तलावात बुडून मृत्यू झाला त्यामुळे या महत्त्वपूर्ण पाणीपुरवठा उदगम स्थळाची सुरक्षा व्यवस्थाराम भरोसे राहिली आहे. कास तलावाच्या 140 हेक्टरच्या सुरक्षिततेसाठी केवळ दोन नळकरी असल्याने दुर्दैवी घटनांना पायबंद घालणे अडचणीचे होत आहे. 

सातारकरांसाठी शनिवार रविवार हक्काचा पिकनिक स्पॉट म्हणून कास तलाव अत्यंत लोकप्रिय आहे. या तलावाचा 140 हेक्टरचा परिसर हा जावली तालुक्यात येतो. मात्र उत्साहाच्या भरात पाण्यात जाणे, पाण्यात उडी मारून धाडसाने पोहण्याचा आततायीपणा करणे, धरणाच्या भिंतीवर वाहन घेऊन जाणे, सामिष मेजवान्या करून दारूच्या बाटल्या तेथेच फोडणे असे प्रकार सर्रास येथे चालतात. या सर्व घटनांवर कार्यक्षेत्र असणार्‍या मेढा पोलीस स्टेशनचे 59 पोलीस कर्मचारी काहीही करू शकत नाहीत.

मुळात कास तलाव ते मेढा पोलीस स्टेशन हे अंतर 41 किलोमीटर आहे. त्यामुळे तेथे स्वमालकीच्या क्षेत्रात सुरक्षा व्यवस्था लावणे हे सातारा पालिकेचे काम आहे. याबाबतची माहिती घेतली असता सर्व परिसर हा दोन नळकर्‍यांवर अवलंबून आहे, असे समजून आले. अशावेळी दुर्दैवी घटना घडल्यास शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्न्यू टीमला प्राचारण करावे लागते.


चेनलिंक जाळीचा प्रस्ताव

सातारा पालिकेने कास तलाव धरणाची उंची वाढवली आणि सातारकरांना अर्धा टीएमसी पाणी वर्षभरासाठी उपलब्ध झाले. मात्र सुरक्षा व्यवस्थेत कोणतेही प्रावधान येथे नाही. कास तलावाच्या पश्चिमेला दाट झाडी असल्याने त्या दिशेने कोणीही या तलावात उतरण्याचे धाडस करत नाही. मात्र कास गावाकडून धरणाच्या भिंतीकडे जाणारा रस्ता पालिकेने खोदून ठेवला आहे. तसेच धरणाच्या भिंतीचा रस्ता गेटने बंद करण्यात आलेला आहे. तरीसुद्धा वाहनासह धरणाच्या भिंतीवर जाण्याची स्पर्धा लागलेली असते. कास तलावाच्या जुन्या बंगल्याजवळ साधारण पंधरा फूट कास तलाव खोल असून साधारण सात ते आठ फुटापर्यंत गाळाने तो भरलेला आहे त्यामुळे येथे दुर्दैवी घटना घडल्यास बचाव कार्य प्रचंड अवघड होते. सातारा पालिकेने याबाबत तातडीने विचार करून कास तलावाच्या प्रवेशकर्त्या बाजूने चेनलिंग जाळी बसवण्याची प्रक्रिया प्रस्तावित केली आहे. तसेच कास तलावाच्या अधिक सुरक्षिततेसाठी किमान सहा सुरक्षारक्षक असणे आवश्यक आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कास तलावात 9 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पुढील बातमी
आयशर टेम्पोच्या धडकेत महिला जखमी

संबंधित बातम्या