उबाठा गटाच्या शिवसैनिकांचा सातारा शहरात जन आक्रोश मोर्चा

ओम फट स्वाहा च्या घोषणाने दणाणले शिवतीर्थ; भ्रष्टाचारी मंत्र्यांचा प्रतीकात्मक रथ काढून केला निषेध

by Team Satara Today | published on : 11 August 2025


सातारा : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी महायुती सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्री तसेच त्यांचे वेगवेगळे राजकीय कारनामे यांचा सातार्‍यात जन आक्रोश मोर्चा काढून निषेध केला. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रताप जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, महिला आघाडीच्या संघटिका छायाताई शिंदे यांनी केले. या भ्रष्टाचारी मंत्र्यांना तात्काळ घरी घालवण्यात यावे पुरोगामी महाराष्ट्राला या मंत्र्यांनी बदनाम केल्याची घणाघाती टीका यावेळी शिवसैनिकांनी कडवट भावना व्यक्त करून केली.
या आंदोलनामध्ये सातारा तालुका संघटक प्रणव सावंत, सातारा तालुकाप्रमुख रमेश बोराटे, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय नलावडे, खटाव तालुकाप्रमुख संजय नांगरे, शहर प्रमुख गणेश अहिवळे, युवा सेना शहर प्रमुख ऍडवोकेट शिवेंद्र ताटे, ज्ञानेश्वर नलावडे, सुनील पवार, आकाश धोंडे, चंद्रकांत पोळ, संजय जाधव, संजय नलावडे इत्यादी शिवसैनिक सहभागी झाले होते. या आंदोलनाला माजी जिल्हा शिवसेनाप्रमुख नरेंद्र पाटील यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
या आंदोलनाविषयी बोलताना प्रताप जाधव म्हणाले, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारमध्ये भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रामध्ये या मंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळे जनतेमध्ये वेगळा संदेश गेला आहे. जनतेमधील हा आक्रोश शिवसैनिक विविध निषेध आंदोलनाच्या माध्यमातून समोर आणत आहेत. अशा भ्रष्ट मंत्र्यांचे तात्काळ राजीनामे घेऊन त्यांना घरी पाठवले जावे, यासाठी हे निषेध आंदोलन असल्याचे प्रताप जाधव यांनी सांगितले.
यावेळी भ्रष्टाचारी मंत्र्यांचे प्रतिकात्मक मुखवटे सादर करून शिवसैनिकांनी सातार्‍यात रथातून रॅली काढली. शिवसैनिकांनी या रॅलीमध्ये पत्ते खेळून तसेच काही मंत्र्यांची नक्कल करून तुम्ही लवकरच पालकमंत्री व्हाल, ओम फट स्वाहा... अशा उपरोधिक घोषणा देत सातारकरांचे लक्ष वेधून घेतले. शिवसैनिकांची ही रॅली छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला वंदन करून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर गेली. यावेळी शिवसेना शिष्टमंडळाने शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख व उपनेते शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन सादर केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शिवसैनिक व पोलीस यांच्यामध्ये कार्यालयात प्रवेश करण्यावरून जोरदार वादावादी झाली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
घरीच शरीर तपासणी करून वेळ आणि पैसा वाचवा
पुढील बातमी
पृथ्वीराज बाबांच्या पाठपुराव्यानेच विमानतळ विस्तारसाठी वेळोवेळी निधी : नामदेवराव पाटील

संबंधित बातम्या