सातारा : पुस्तके अथवा ग्रंथ यांच्यासारखा दुसरा गुरू नाही, असे म्हटले जाते. प्रत्येक पिढीची आवड-निवडही वेगळी असते. त्यामुळे काळाच्या कसोटीवर आणि वाचकांच्या अभिरुचीनुसार टिकणारी पुस्तके ही चिरकाल आनंद देणारी असतात. यशस्वी झालेल्या अनेक व्यक्तींच्या जीवनात ग्रंथालयांनी, पुस्तकांनी मोलाची भूमिका बजावली आहे. चांगली पुस्तके वाचणे म्हणजे आपल्या जीवनात चांगले मित्र कमावल्यासारखेच आहे. चांगली पुस्तके चांगल्या मित्राएवढीच मार्गदर्शक असतात, असे प्रतिपादन माजी आमदार आनंदराव पाटील यांनी केले.
अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) स्मृतिप्रीत्यर्थ ग्रंथालय पुरस्कारांचे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाचे संस्थापक रवींद्र भारती, अध्यक्ष डॉ. राजेंद्र माने, कार्यवाह शशिभूषण जाधव, उपाध्यक्ष दत्तात्रय मोहिते आदी उपस्थित होते.
डॉ. भोईटे म्हणाले, ‘‘तुमच्या मनात चाललेले विचार बदलल्याशिवाय तुम्ही स्वत:ला बदलू शकणार नाही. तुम्ही जसा विचार करता, तसेच घडत असता. जीवनाला चांगला आकार देण्यासाठी तुम्हाला तुमच्या विचारांची गुणवत्ता सुधारावी लागेल. विचारप्रक्रिया प्रभावित करणारी एक गोष्टही जीवन कायमस्वरूपी बदलून टाकू शकते. विचार करण्याच्या प्रक्रियेत अंतर्दृष्टी, एक जाणीव, एक कल्पना, एक परिवर्तन आणि सजगतेची आवश्यकता असते, तरच तुमचे जीवन पहिल्यासारखे राहणार नाही. चांगली पुस्तके वाचल्यामुळे हा बदल होऊ शकतो. पुस्तके महान लोकांच्या ज्ञानाचे भांडार असतात. पुस्तके वाचताना आपणास त्या महान आत्म्याच्या विचाराची अनुभूती येते. आपल्याला स्वामी विवेकानंद, गांधीजींची थेट अनुभूती भलेही घेता आलेली नसेल. मात्र, त्यांचे आत्मकथन वाचून त्यांच्या विचारांची अनुभूती नक्कीच घेऊ शकतो.’’
यावर्षीचा उत्कृष्ट ग्रंथ वाचक पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांना, उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार गोंदवले (ता. माण) येथील संत ज्ञानेश्वर वाचनालय व ग्रंथालय यांना, उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार मोर्वे (ता. खंडाळा) येथील गुरुकृपा वाचनालय व क्रीडा मंडळचे अध्यक्ष रवींद्र ठोंबरे यांना, तर उत्कृष्ट ग्रंथालय कर्मचारी पुरस्कार म्हासुर्णे (ता. खटाव) येथील सरस्वती वाचनालयाच्या ग्रंथपाल जयश्री इनामदार यांना देऊन गौरविण्यात आले.
यावेळी रवींद्र भारती यांनी प्रास्ताविक केले. डॉ. माने यांनी स्वागत केले. सुनीता कदम यांनी सूत्रसंचालन केले. सादिक शेख यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला प्रा. श्रीधर साळूंखे, ॲड. सचिन तिरोडकर, संदीप साबळे, नंदाताई जाधव, आनंद ननावरे, गौतम भोसले, संजय साबळे, मदन देशपांडे, संदीप आवाड, शेखर चव्हाण व मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते.