सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. जलजीवन मिशनची कामे पूर्ण केल्यामुळे जिल्ह्यात त्यांचा टंचाईग्रस्त भागासाठी केवळ 68 पाण्याचे टँकर सुरू आहेत, अशी माहिती सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार की नाही याची समन्वय समितीच्या बैठकीत प्राथमिक चर्चा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री देसाई यांनी पत्रकारांशी पाणी टंचाई आढावा बैठकीनंतर संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील तसेच अधिकारी उपस्थित होते.
मंत्री देसाई म्हणाले, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी विविध पाणी योजनांची कामे पूर्ण केली आहेत. यावर्षी टँकरची संख्या कमी झालेली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात 218 टँकर होते. यावर्षी जिल्ह्यात 68 टँकर सुरू आहेत. जलजीवन मिशनची कामे पूर्ण केली आहेत. तसेच आमदार फंड, डोंगरी विकास निधी या माध्यमातून विविध योजनांची कामे झाली असल्याने टँकरची संख्या कमी झाली आहे. ज्या ठिकाणाहून मागणी होईल तेथे टॅंकर देण्याची सूचना प्रांत व तहसीलदार यांना केली आहे. 10 जून पर्यंत पावसाची अपेक्षा असून तोपर्यंत टँकर सुरू ठेवले जातील. जलजीवन मिशनच्या कामाची त्या-त्या भागातील आमदारांनी येत्या पंधरा दिवसात पाहणी करून त्याचा अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना द्यायचा आहे. त्यानंतर अपूर्ण कामे करण्यासाठी तातडीने निधी दिला जाईल, असे देसाई यांनी सांगितले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रित लढणार का, या प्रश्नावर शंभूराज देसाई म्हणाले, समन्वय समितीच्या बैठकीत या विषयावर प्राथमिक चर्चा होईल. त्यानंतर ज्या मुद्द्यावर निर्णय होईल तो मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांना सांगितला जाईल. त्यावर ते योग्य तो निर्णय घेतील. माझ्यामते महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत.
सातारा जिल्ह्यात कोणतेही पॅनिक नाही
भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर कोयना धरणाची संवेदनशीलता लक्षात घेता सुरक्षिततेची काय उपाययोजना केली ? या प्रश्नावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये असे कोणतेही पॅनिक नाही. कालच मी पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर तसेच सर्व उपविभागीय अधिकारी यांच्याशी दृकश्राव्य माध्यमाद्वारे बैठक घेतली. कोयना धरण परिसरात आठ पोलीस चौकी असून तेथील सुरक्षितता वाढवण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या तसेच कोणत्याही अधिकाऱ्यांनी पोलीस मुख्यालय सोडू नये, अशी सूचना देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, याबाबत पालकमंत्री शंभूराज यांना छेडले असता ते म्हणाले, महायुती म्हणून निवडणुका एकत्र लढल्या पाहिजेत या मताचा मी आहे. पण कुंडलीचा मला कोणताही अभ्यास नाही. त्यामुळे या विषयावर मी भाष्य करू शकत नाही, असे ते म्हणाले.