मूर्तीभंजन हेच माध्यमांचे प्रथम कर्तव्य : गिरीश कुबेर ; 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विशेष मुलाखत

by Team Satara Today | published on : 04 January 2026


स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : मूर्तीभंजन करणे हेच माध्यमांचे प्रमुख कर्तव्य आहे. ते माध्यमकर्मींनी चोखपणे करणे गरजेचे आहे. ते त्यांनी केले नाही तर त्यांची गरजच उरणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक आणि लेखक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले. 

99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज (दि. ४) आयोजित विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होते. किशोर बेडकीहाळ आणि प्रसन्न जोशी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

कुबेर म्हणाले, आज प्रसार माध्यमांना उत्तरदायित्व उरलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. काही वृत्तपत्रांचे मालक हे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे ते विशिष्ट बाजू घेऊन पत्रकारिता करतात. परंतु त्यामुळे समग्र माध्यमांवर अप्रामाणिकपणाचा आरोप केला जातो. त्यातून पत्रकारिता सरसकट बदनाम होत राहते. वास्तुत: शरणता न दाखवणे हे माध्यमांचे हे प्रमुख कर्तव्य आहे. माध्यमांनी आपले काम चोखपणाने करणे अपेक्षित आहे.

सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना कुबेर म्हणाले,आपण समाज म्हणून गुणवत्तेला मान द्यायला शिकलो नाही. सत्ताशरण समाज ही आपली ओळख बनत चालली आहे. आपण बुद्धिवंतांचा आदर करत नाही. सत्ता हेच आपल्याला सौंदर्य वाटू लागले आहे. हे महाराष्ट्रासाठी जास्त धोकादायक आहे. सामाजिक संवेदना आणि आकलनाच्या मर्यादा दिसतात. 


आजच्या साहित्य विश्वावर भाष्य करताना ते म्हणाले, आजही मोठा वाचकवर्ग पुलंच्या पुढे गेलेला नाही. माध्यमांनी निवडक वर्गाला प्राधान्य दिले आहे. भूमिका न घेणे हे सडू लागलेल्या समाजाचे लक्षण आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जे मिळेल ते खायचे ही खाद्य संस्कृती दलित समाजावर लादलेली आहे ; 'अन्न हे अपूर्णब्रह्म' पुस्तकावरील परिचर्चेत सूर
पुढील बातमी
महाराष्ट्राची हास्य जत्रा’ अन हास्यकल्लोळ ! टाळ्यांचा कडकडाट, सातारकरांनी कलाकारांना भरभरून दाद दिली

संबंधित बातम्या