बिग बॉस विजेता सुरज चव्हाण याचा 'राजा राणी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. मात्र आता हा चित्रपट अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. 'राजा राणी' हा चित्रपट समाजासाठी घातक असून या चित्रपटातून समाजामध्ये चुकीचा संदेश जात आहे म्हणून त्या चित्रपटावर तात्काळ बंदी घालावी नाहीतर न्यायालयाचे दरवाजे ठोठाहून चित्रपटावर कायदेशीररित्या बंदी घातली जाईल असा निर्वाणीचा इशारा प्रसिद्ध ॲड. वाजिद खान (बिडकर) यांनी श्रमिक पत्रकार भवन या ठिकाणी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिला.
ॲड. खान असे म्हणाले, ' सध्या सुरज चव्हाण हे प्रसिध्द व्यक्तिमत्व महाराष्ट्रात गाजत असून राजा राणी हा त्याचा चित्रपट पाहुन अनेक तरुण तरुणी आत्महत्या करु शकतात, याची शक्यता नाकारता येत नाही. चित्रपटाच्या शेवटी असे दाखवण्यात आले आहे की समाज व नातेवाईकांमुळे चित्रपटातील दोन प्रेमी एकत्र होवू शकत नाहीत, म्हणून चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्री टोकाचे पाऊल एकमेकांच्यावर गोळ्या झाडून आत्महत्या करतात. असा संदेश चित्रपटाच्या सरते शेवटी देण्यात आलेला आहे जो अत्यंत चुकीचा आहे.
सध्या सुरज चव्हाण हे महाराष्ट्रातील प्रसिध्द व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटाचे अनुकरण महाराष्ट्रातील अनेक तरुण तरुणी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करतील. ह्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून सुरज चव्हाण यांचा राजा राणी हा चित्रपट बॅन करण्यात यावा अशी मागणी प्रसिद्ध ॲड. वाजिद खान (बिडकर) यांनी केली आहे. या चित्रपटात अभिनेता रोहन पाटील, अभिनेत्री वैष्णवी शिंदे सोनाई फिल्म क्रिएशन प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केलं आहे.