सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफीसह वीज थकबाकी माफीचा लाभ; भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची माहिती

by Team Satara Today | published on : 24 July 2026


सातारा : राज्य सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’अंतर्गत सातारा जिल्ह्यातील 53 हजार 736 खातेदार शेतकर्‍यांना 569 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या योजनेतील लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाणार आहे. याशिवाय 7.5 अश्‍वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपधारकांची वीज थकबाकी माफ करण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकर्‍यांना 1,068 कोटी रुपयांचा अतिरिक्त दिलासा मिळणार आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि भाजप किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी भाजपचे गटनेते अविनाश कदम आणि विकास गोसावी उपस्थित होते.

रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, राज्यातील सुमारे 56 लाख शेतकर्‍यांना 36 हजार 585 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यावेळी पूर्वीच्या कर्जमाफी योजनांतील काही अटी शिथिल करण्यात आल्या असून, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकर्‍यांनाही दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नियमित कर्जफेडीची अट आणि 50 हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर लाभाची पूर्वीची मर्यादाही हटविण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 7.5 एचपीपर्यंतच्या कृषी वीजपंपांची सुमारे 48 हजार कोटी रुपयांची जुनी वीज थकबाकी माफ करण्याचा निर्णय जाहीर केल्याचेही त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे लाखो शेतकर्‍यांच्या वीजबिलाचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्‍न सुटण्यास मदत होणार असल्याचा दावा करण्यात आला.

शेती क्षेत्र अधिक सक्षम आणि शाश्‍वत करण्यासाठी राज्य सरकारकडून दरवर्षी सुमारे 95 हजार कोटी रुपयांची तरतूद केली जात असून, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, सौर कृषीवाहिनी, सौरपंप आणि नदीजोड प्रकल्प यांसारख्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. भविष्यात दिवसा शंभर टक्के वीजपुरवठा आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सिंचन प्रकल्पांना गती देण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर केंद्र सरकार गंभीर; आंदोलनाचे राजकारण करू नका : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, नीट पेपरफुटीतील दोषींवर फास्टट्रॅक न्यायालयात खटले
पुढील बातमी
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 9 ऑगस्ट रोजी डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे जाहीर व्याख्यान; उमेश चव्हाण यांची माहिती

संबंधित बातम्या