सातारा : पूर्वी दाखल केलेली कोर्टातील केस मागे घेण्याच्या कारणावरून आझादपूर, ता. कोरेगाव येथे एका शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान अनिकेत शिरतोडे (वय ३५) यांनी तक्रार दिली आहे. दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरात तसेच घराबाहेरील उसाच्या शेतात ही घटना घडली.
या वेळी आरोपी नंदकुमार उर्फ पप्या संतोष शिरतोडे याने तलवारीने, गणेश विजय जाधव याने कुऱ्हाडीने, जितेंद्र गोटुराम शिरतोडे याने चाकूने वार करून फिर्यादीस गंभीर जखमी केले. तसेच दत्तात्रय विष्णू भोसले याने फिर्यादी व त्यांच्या आईस मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या पत्नीला देखील धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कोरेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर दि. ८ एप्रिल २०२६ रोजी रात्री उशिरा कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री तेरणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपास कामी सूचना केल्या. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड तपास करत आहेत.