सातारा : ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे व त्यांची कोणत्याही परिस्थितीत पिळवणूक होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
जिल्हा ग्राहक संरक्षक परिषदेची बैठक जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, पोलीस उप अधिक्षक सबनीस, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघोले तसेच विभागीय नियंत्रक एसटी महामंडळाचे अधिकारी , अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सातारा शहरात ॲटो रिक्षाचे अवाजवी दर आकारणीबाबत ग्राहक संरक्षक परिषदेच्या सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला यावर बोलताना जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, प्रादेशिक परिवहन विभागाने यावर कार्यवाही करावी, ॲटो रिक्षा ची दर आकारणी मिटरप्रमाणे व्हावी यासाठी प्रवासी संघटना, ॲटो रिक्षा चालकांच्या संघटना यांना एकत्रित घेऊन मार्ग काढावा, रेल्वे गाडयांचे वेळापत्रक पाहून गर्दी असणाऱ्या वेळेत एस टी महामंडळाने बसेस उपलब्ध करुन द्याव्यात. शाळा, महाविद्यालयीन मुलींना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी दामिनी पथक अधिक गतिमान करावे. थंड पाण्याच्या जार ची तपासणी होणे आवश्यक असल्याचे अशासकीय सदस्यांनी सांगितले. यावर बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, पाणी थंड करण्यासाठी अनेकदा केमिकलचा वापर केला जातो. अशा केमिकलचा वापर शरीरासाठी हानिकारक असल्याने थंड पाण्याचे जार विक्री होणाऱ्या ठिकाणचे नमुने गोळा करावे व तपासाणीसाठी पाठवावेत. अहवाल येताच त्यानुसार कार्यवाही करावी. पुढील पिढीला सुरक्षित ठेवण्यासाठी शाळा महाविद्यालयांच्या परीसराच्या निर्बंधीत क्षेत्रात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होणार नाही. यावर पोलीस विभागाने आवश्यक ती दक्षता घ्यावी. बॉम्बे रेस्टॉरन्टच्या पूलाजवळ पावसाळयामध्ये पाणी साचते ही ड्रेनेज सिसिस्टीम व्यवस्थित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना नगरपालिकेने कळवावे. यावेळी अशासकीय सदस्यंनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांच्या आधारे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी यंत्रणांना सूचना दिल्या.