गेल्या मंत्रीमंडळात जो फॉर्म्युला होता तोच यावेळी लागू असायला हवा : शंभूराज देसाई

by Team Satara Today | published on : 02 December 2024


मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळाल्यानंतर महायुती सरकारचा शपथविधी मोठ्या जल्लोषात पार पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रिपदावरुन निर्माण झालेल्या तिढ्यामुळे सत्तास्थापनेचा आधी सहज वाटणारे कार्य भलतेच अवघड होऊन बसले आहे. अशातच अद्याप भाजपकडून मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा न करण्यात आल्यामुळे आता भाजपच्या गोटातील अस्वस्थता प्रचंड वाढल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी नाईलाजाने मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दाखवली असली तरी गृहमंत्रीपद आणि काही महत्त्वाच्या खात्यांची मागणी त्यांनी केली आहे. मात्र, भाजपने कोणत्याही परिस्थितीत गृहमंत्रीपद सोडायला नकार दिला. त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज होऊन साताऱ्यातील दरे या आपल्या मूळगावी निघून गेले असल्याची चर्चा आहे. 

दरम्यान, याच मुद्यावरून  एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांनी यावर भाष्य करत थेट फॉर्म्युला सांगीतला आहे. ज्या पद्धतीने मागच्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्रीपद ज्यांच्याकडे त्यांनाच गृहमंत्रीपद होतं, तोच फॉर्म्युला आता लागू असायला हवा. असा सल्ला त्यांनी दिला आहे. मात्र या बाबत आमचे वरिष्ठ ठरवतील. आमच्या फॉर्म्युल्याची चर्चा आम्ही माध्यमासमोर करणार नाही असेही आमदार शंभूराज देसाई म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या फोटोचा दुसरा अर्थ काढू नये. असे अनेक फोटो होते तोच फोटो बाहेर कसा आला? तसेच मंत्रीमंडळाच्या विस्ताराची फार वाट पहावी लागणार नाही. भाजपचा गटनेता निवडीची प्रक्रिया पार पडली की सर्व होऊन जाईल असेही ते म्हणाले. 

रोहित पवार पाच वर्ष विधीमंडळात आहेत. हुंडाबंदी कायदा महाराष्ट्रात आहे, त्याची प्रत त्यांना हवी असेल तर मी पाठवून देईल. तुम्हाला लोकांनी का झिडकारलं, त्याचा विचार करा आमच्या घरात डोकावू नका. तुमच्या तीन पक्षात विरोधीपक्ष नेता कोण होणार हे आधी ठरवा. जनतेने महायुतीला स्विकारलं महाविकास आघाडीला झिडकारलंय, असे म्हणत आमदार शंभूराज देसाई यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

मुख्यमंत्री नेहमी गावी जातात, वेळ भेटला की गावी जातात, लोकांन भेटतात. एकनाथ शिंदेंना थोडा सर्दीचा त्रास आहे. थकवा आहे, कफचा त्रास आहे. आम्हीच त्यांना त्रास होऊ नये म्हणून गावी आराम करायला सांगितलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आजवर जी भूमिका घेतली ती उघड घेतली. त्यामुळे काळजी नसावी, असेही शंभूराज देसाई म्हणाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डॉक्टर सांगतात हिवाळ्यात मुलांना सर्दी- खोकला झाल्यास तुपात २ गोष्टी टाकून द्या
पुढील बातमी
विमानतळ प्राधिकरणात नोकरीची सुवर्णसंधी

संबंधित बातम्या