कराड : येथील प्रीतिसंगम बागेपाठोपाठ पालिकेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्रातही सापांचा वावर वाढला आहे. चार महिन्यांत जवळपास आठ घोणससह वेगवेगळ्या जातीचे साप तेथे पकडले आहेत. कर्मचारी काम करतानाच साप दिसत असल्याने त्यांच्यात भीती निर्माण होत आहे. सर्पमित्रांनी पकडलेले साप नैसर्गिक अधिवासात सोडूनही अद्याप परिसरात सापांचा वावर असल्याची भीती आहे. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील सुमारे ५० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या जिवाला घोर लागल्याची स्थिती आहे. पालिकेने त्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
शहरात दोन जलशुद्धीकरण केंद्रे आहेत. राज्यातील पहिले जलशुद्धीकरण केंद्र कऱ्हाडला झाले. गरज ओळखून सध्या जुने जलशुद्धीकरण केंद्र बंद आहे. त्याची वयोमर्यादाही संपली आहे. त्यामुळे नवे जलशुद्धीकरण केंद्र पालिकेने कोयना नदीकाठी उभारले. तेथे पालिका व कंत्राटी कर्मचारी आहेत. पालिकेचे पाच, तर ४५ कंत्राटी कर्मचारी आहेत. त्यांच्याकडून जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल दुरुस्तीसह सर्व कामे होतात.
कोयना नदीकाठी केंद्र असल्याने परिसरात झाडेझुडपे आहेत. सहा महिन्यांत त्या परिसरात सरपटणारे प्राणी वाढले आहेत. त्याचा त्या केंद्रात काम करणाऱ्यांना त्रास होतो. केंद्रात सहा महिन्यांत आठ वेगवेगळ्या जातीचे साप आढळून आले. सर्पमित्रांनी त्यांना पकडून नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडले आहे.