सातारा : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत असून ठिकठिकाणी वळीव पाऊस हजेरी लावत आहे. सोमवारीदेखील सातारा शहराच्या पूर्वेला धो-धो पाऊस तर पश्चिम भाग कोरडा ठाक राहिल्याचा विरोधाभास सातारकरांनी अनुभवला. जिल्ह्यात जावली, म’श्वर तालुक्यातही वळवाच्या पावसाने दमदार हजेरी लावली. दरम्यान, भुईंजजवळ बदेवाडी येथे वीज पडून तीनशे कडबा पेंडी जळाली.
सातार्यात सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरातील बॉम्बे रेस्टॉरंट, माहुली, वाढेफाटा या परिसरात पाऊस झाला तर सातारा शहरातील मध्यवर्ती भागात पावसाने पाठ फिरवली. बॉम्बे रेस्टॉरंट येथील सेवा रस्त्यावर या पावसाने तळे निर्माण झाले. भुईंज परिसरात सोमवारी सायंकाळी वळवाचा तडाखा बसला. यावेळी बदेवाडी येथे कडब्याच्या गंजीवर वीज कोसळली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
सोमवारी दुपारी साडेचारच्यादरम्यान बदेवाडी भुईंज येथील बावधनकर वस्ती शेजारी असलेल्या लक्ष्मण परबती रोमन यांच्या शेतातील गंजीवर वीज कोसळून वैरण जळाली. शेजारी असलेले पशुधन व लोकवस्ती सुदैवाने बचावली. आगीत 300 कडबा पेंडी भस्मसात झाली. सातारा, महाबळेश्वर, जावली तालुक्यातही काही ठिकाणी वळीव पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने पाणीच पाणी झाले होते. दरम्यान, हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात दि.13 रोजी ऑरेंज तर दि. 15 व दि. 16 मे ला यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुढील चार दिवस वळीव पावसाची शक्यता कायम आहे. वळवाचा पाऊस पडू लागल्याने ग्रामीण भागात हंगामपूर्व मशागतींना वेग आला आहे.