नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याची व्याजासहित परतफेड करण्यासाठी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उध्वस्त केले. पण भारताच्या या हल्यानं थयथयाट करणाऱ्या पाकिस्ताननं तरीसुद्धा आपल्या खुरावती थांबवल्या नाहीत. किंबहुना ऑपरेशन सिंदूरआधीसुद्धा पाकिस्तान या-न त्या मार्गानं भारतात अस्थिरता निर्माण करण्याच्याच प्रयत्नांत दिसून आला. नुकताच त्यासंदर्भातील एक मोठा खुलासा सैन्यदलाच्याच वतीनं करण्यात आला.
सैन्याच्या माहितीनुसार भारतानं पाकिस्तानचा मोठा कट उधळून लावला. उपलब्ध माहितीनुसार पाकिस्तानच्या निशाण्यावर अमृतसरचं सुवर्णमंदिर होतं. 6 आणि 7 मे रोजी पाक सैन्यानं सुवर्णमंदिराला लक्ष्य करत तिथं हल्ला करण्याचा कट रचला होता. मात्र भारतीय सैन्यानं हा डाव उधळून लावला. भारतीय सैन्यानं आकाश क्षेपणास्त्र प्रणालीद्वारे हा कट उधळला. इतकंच नव्हे, तर यादरम्यान पाकिस्तानी क्षेपणास्त्रही पाडल्याची माहिती उघड करण्यात आली.
दहशतादाला खतपाणी देणारा आणि दहशतवाद्यांना आसरा देणारा पाकिस्तान 6 आणि 7 मे रोजी जम्मू काश्मीर, गुजरात आणि पंजाबमधील काही शहरांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता किंबहुना तसे प्रयत्नही झाले. मात्र भारतीय लष्करानं हे सर्व मनसुबे उधळून लावले. नुकतंच भारतीय सैन्यदलानं अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आणि इतर शहरांवरील हल्ले कसे परतवून लावले याची सविस्तर माहिती देत पाकिस्तानच्या क्षेपणास्त्रांना कशा पद्धतीनं मातीमोल केलं हेसुद्धा दाखवून दिलं.
15 इन्फेंट्री डिवीजनटे जीओसी मेजर जनरल कार्तिक सी. शेषाद्री यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार 'पाकिस्तानी सैन्यानं काही लक्ष्य निश्चित केलं नसतानाही भारतीय सैन्यानं अचूक तर्क लावत सैन्यतळ आणि धार्मिक स्थळांवर सुरक्षा वाढवली. यामध्ये सुवर्णमंदिर अतिशय महत्त्वाचं धार्मिक स्थळ ठरलं. ज्यामुलं सुवर्ण मंदिराला पूर्णत: हवाई सुरक्षा कवच देण्याच्या हेतूनं आम्ही अत्याधुनिक शस्त्रांची व्यवस्था केली. 8 मे रोजी पहाट होतच होती तितक्यात पाकिस्तानच्या दिशेनं मानवरहित हवाई हल्ला होत असल्याचं लक्षात आलं. यामध्ये मुख्यत्वे ड्रोन आणि लांबवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता.'
शेषाद्री यांच्या माहितीनुसार या हल्ल्यासाठी, तो परतवून लावण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज होतं. कारण, या हल्ल्याची कुणकुण इथं सैन्याला होतीच. आपल्या उत्तमोत्तम सैनिकांनी आणि एअर डिफेंन्स गनर्सनी पाकिस्तानचे हे नापाक मनसुबे उधळून लावले आणि सुवर्ण मंदिरावरील हल्ले परतवून लावले.