सातारा : स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात शहरी भागासह ग्रामीण भागातील गरजु व गरीब रुग्ण येत असतात. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आरोग्य सुविधा देण्याबरोबर त्यांच्यावर चांगले उपचार करावेत. याबाबतीत कोणत्याही तक्रारी येऊ देवू नका, रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर उपचार करावे, त्यांना खासगी रुग्णालयात पाठवू नये, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. दरम्यान, अनपेक्षीत भेटी दरम्यान रुग्णालयातील सुविधांचे वास्तव समोर मंत्री अबीटकर यांच्या समोर आल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. करपे यांना चांगलेच धारेवर धरले.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आबिटकर यांनी स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाची पाहणी करुन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मंत्री आबिटकर म्हणाले, जिल्हा रुग्णालय असूनही येथे स्वच्छतेचा अभाव ही बाब रुग्णांसाठी अयोग्य आहे. येथे गर्भवती महिलांना प्रसुतीनंतर दिले जाणारे अन्न हे निकृष्ट दर्जाचे आहे. दिला जाणारा आहाराची थाळीच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासमोर उपस्थित झाल्यानंतर या थाळीतील आहार तरी पुरेसा आहे का? रुग्णालय स्वच्छतेवर का भर दिला जात नाही, अशा एकामागुन एक प्रश्नांची सरबत्ती सुरु होती.
रुग्णालयात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची वैद्यकीय प्रतिपुर्ती प्रमाणीकरणासाठी येणारी देयके वेळेत प्रमाणित करुन द्यावी. रुग्णालयात कामासाठी येणाऱ्यांना हेलपाटे मारायला लावू नका. त्यांची कामे तातडीने करा. समाजसेवक अधिक्षकांनी रुग्णांसाठी असणाऱ्या हक्कांची व सुविधांची माहिती देण्याबरोबर त्यांना स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण जिल्हा रुग्णालयात लवकरात लवकर उपचार कसे मिळतील, यासाठी काम करावेत. त्याचबरोबर रुग्णांना देण्यात येणारे जेवणाची तपासणी करुन जेवणात आणखीन रुग्णांना पोषक पदार्थ वाढवावेत, असे निर्देशही सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आबिटकर यांनी दिले.