सातारारोड : पाणीपुरवठा योजनेच्या केलेल्या कामाचे थकीत बिल सरकारकडून वेळेत न मिळाल्याने हर्षल पाटील या युवकाने टोकाचे पाऊल उचलून स्वतःचे जीवन संपवल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे, असे नमूद करत या घटनेला सर्वस्वी सरकारचा नियोजनशून्य कारभार व बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी काल तांदूळवाडी (ता. वाळवा) या गावी आमदार जयंत पाटील यांच्या समवेत जाऊन हर्षल पाटील यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आमदार शिंदे म्हणाले, पाणीपुरवठा योजनेचे बिले वेळेत न मिळाल्याने या व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाच्या बोजामुळे त्यांनी स्वतःचे जीवन संपवले. ही घटना अत्यंत वेदनादायी आहे.
मात्र, शासनाच्या वतीने प्रतिनिधी म्हणून कोणीही या कुटुंबीयांची विचारपूस केली नाही, हे सर्वात दुर्दैवी आहे. हर्षल पाटील हे सरकारचे ठेकेदार नव्हते, असे सांगणे म्हणजे हात झटकण्याचा प्रकार आहे. मूळ ठेकेदाराचे बिल अदा केले असते, तर हर्षल पाटील यांच्यावर टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ आलीच नसती.