'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक

केंद्रीय सहकार संचालक डी. के. वर्मा; कारखान्याच्या सदिच्छा भेटीप्रसंगी काढले गौरवोद्गार

सातारा : अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने प्रगतीचा आलेख कायम चढता ठेवून आदर्शवत कामकाज सुरु ठेवले आहे. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असलेला हा सहकारी साखर कारखाना राज्यातील सहकारी साखर कारखानदारीसाठी दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय सहकार विभागाचे संचालक डी. के. वर्मा आणि नॅशनल फेडरेशन ऑफ को- ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्लीचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईक नवरे यांनी काढले. 

डी. के. वर्मा व प्रकाश नाईक नवरे यांनी अजिंक्यतारा कारखान्यास सदिच्छा भेट देऊन कारखान्याच्या  कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोघांचे स्वागत केले. यावेळी कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

वर्मा म्हणाले, केंद्र शासनाने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याच्या धोरणास प्रोत्साहन देणेसाठी सहकारी साखर कारखान्यांना प्राधान्य देण्याचे धोरण ठरविलेले आहे. तसेच मक्या पासून इथेनॉल निर्मितीसही प्रोत्साहन देण्याचे धोरण आखलेले आहे. देशात सुमारे ३०० लाख मे.टन मक्याचे उत्पादन होते. वर्षातून २ पिके घेता येतात व कमी पाण्यामध्ये पिक तयार होते. साखर कारखान्यांनी हंगामामध्ये सिरप, बी हेवी व सी हेवी पासून इथेनॉल निर्मिती करावी आणि बिगर हंगामामध्ये मक्या पासून इथेनॉल निर्मिती करावी. यामुळे डिस्टिलरी प्लँटचा वापर वाढेल आणि त्यातुन साखर कारखान्यांना आर्थिक फायदाही होईल, असे ते म्हणाले. तसेच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने बंद असलेला प्रतापगड सहकारी साखर कारखाना भागीदारी तत्वावर चालविणेस घेऊन तोही यशस्वीपणे सुरु केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आणि सहकारातून सहकाराचा विकास केले बद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अभिनंदन केले. 

प्रकाश नाईकनवरे म्हणाले, जुलै २०२१ मध्ये स्वतंत्र सहकार मंत्रालय सुरु केलेले असून तेव्हा पासून सहकारी संस्थांना विशेष प्राधान्य मिळत आहे. साखर कारखान्यांनी एफआरपी पेक्षा जादा दिलेला ऊस दर हा कारखान्यांचा उत्पन्न गृहित धरुन त्यावर इनकम टॅक्स भरण्याच्या नोटीसा होत्या. स्वतंत्र सहकार मंत्रालय झाल्यामुळे साखर कारखान्यांचे आयकराचे मोठे संकट दूर झालेले आहे.

मागील बातमी
सैफवरील हल्ल्यामुळे प्रभासचा 'स्पिरीट' अन् ज्युनियर NTR च्या 'देवरा 2'वर परिणाम
पुढील बातमी
छत्तीसगडमध्ये १४ नक्षलवाद्यांचा खात्मा

संबंधित बातम्या