सातारा : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप दुसऱ्या दिवशीही सुरुच होता. त्यामुळे प्रवाशांचे, विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हात झाले. दरम्यान, खासगी वडाप मात्र सुसाट होते. ज्या ठिकाणी संघटनेच्या नेत्यांचे वर्चस्व आहे, त्या आगारातील एसटीच्या फेऱ्या बंद ठेवून प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरु आहे. त्यामध्ये कराड पूर्णत: बंद असून वडूज आगारात फक्त एकच फेरी सुरु आहे. महाबळेश्वर आगाराची मेढा आगाराच्या केवळ तीन फेऱ्या सुरु आहेत. दरम्यान, जे संपात सहभागी कर्मचारी आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याची चर्चा सातारा आगारात सुरु होती.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही सुरु असल्याने शहराकडे व कामानिमित्ताने जाणाऱ्यांची गैरसोय झाली. या संपामुळे कराड आगारातील सर्वच फेऱ्या रद्द झाल्या होत्या. मेढा आगारात केवळ तीन फेऱ्या सुरु होत्या. तर महाबळेश्वर आगारात २१ फेऱ्या, खंडाळा आगारातील १७ फेऱ्या, वडूज आगारात १ फेरी सुरु होती. सातारा आगाराच्या नियोजित फेऱ्या १५३ होत्या. त्यापैकी ४७ फेऱ्या रद्द झाल्या. कोरेगाव आगाराच्या नियोजित १५६ फेऱ्या होत्या. त्यापैकी १३५ फेऱ्या रद्द झाल्या. फलटण आगाराच्या १८६ नियोजित फेऱ्या होत्या. त्यापैकी १५४ फेऱ्या रद्द झाल्या, वाई आगाराच्या १६४ फेऱ्या नियोजित होत्या. त्यापैकी ८५ फेऱ्या रद्द झाल्या. पाटण आगाराच्या २४१ फेऱ्या नियोजित होत्या. त्यापैकी १३0 फेऱ्या रद्द झाल्या. दहिवडी आगारातील १0८ फेऱ्या नियोजित होत्या. त्यापैकी १७ फेऱ्या रद्द झाल्या. मेढा आगारातील ७३ फेऱ्या नियोजित होत्या. त्यापैकी ७0 फेऱ्या रद्द झाल्या. महाबळेश्वर आगारातील ११४ फेऱ्या नियोजित होत्या. त्यापैकी ९३ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. पारगाव खंडाळाच्या नियोजित ६७ फेऱ्या नियोजित होत्या. त्यापैकी ५२ फेऱ्या रद्द झाल्या. वडूज आगारातील १९६ फेऱ्या होत्या. त्यापैकी १९५ फेऱ्या रद्द होत्या. सातारा जिह्यातील ११ आगारातून १८७८ फेऱ्यापैकी १३९८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. या संपामुळे प्रवाशी, विद्यार्थी वर्गाचे बेहाल सुरु आहेत.
विभागीय नियंत्रकांचे एसटी सुरु ठेवण्याचे प्रयत्न
विभागीय नियंत्रक रोहन पलंगे हे उंब्रजनजिकचे असल्याने त्यांचा प्रयत्न सातारा जिल्ह्यातील ११ आगार सुरु राहण्याचे आहेत. मात्र, संघटनांचे नेते त्यांनाही जुमानेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिथे-जिथे संघटनांच्या नेत्यांचे प्रभूत्व आहे तेथे तेथे संपाचा परिणाम जाणवत आहे.