सातारा : सप्टेंबरमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर पंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर शेखर गोरे आमदार होणार, हे मी जबाबदारीने सांगतो. माझ्या कार्यकर्त्यांनी या मतदारसंघांमध्ये भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस केला आहे. त्यामुळेच जानेवारी-फेब्रुवारीच्या आसपास माझ्या कार्यकर्त्यांना नक्की न्याय मिळेल, असा विश्वास सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीमध्ये माण विधानसभा मतदार संघातून भाजपचे सध्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. या विजयात मोठा वाटा हा त्यांचे बंधू शेखर गोरे यांचा होता. या निवडणुकीच्या आधीपर्यंत या दोन्ही भावांमध्ये विधानसभेच्या जागेवरून मोठा वाद होता. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवून दोन्ही भावांना एकत्र आणले. वाद मिटल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत ना. जयकुमार गोरे यांना मदत झाल्याने त्यांचा दणदणीत विजय झाला. त्या दरम्यान, शेखर गोरे यांना आमदार करण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. याबाबत स्वत: शेखर गोरे यांनी माण तालुक्यातील एका जाहीर कार्यक्रमात वक्तव्य केले आहे.
शेखर गोरे म्हणाले, येताना मला काही लोक विचारत होते, भाऊ जयाभाऊ मंत्री झाले, ताई पण भविष्यात उपनगराध्यक्षा होतील; पण भाऊ आपलं काय? आपण कधी आमदार होणार? पण मी परत एकदा सांगतो, जबाबदारीने सांगतो, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर पंचायत याच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये होणार आहेत. त्या निवडणुका झाल्यानंतर,निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर, त्याच्या याद्या तयार झाल्यानंतर, एका महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर होणार आहे. त्यामध्ये शेखर गोरे तुमच्या आशीर्वादाने शंभर टक्के आमदार होणार आहे. हे असं बोलायंच नसतं; पण मी जबाबदारीने बोलत आहे. प्रामाणिक बोलत आहे आणि ठासून बोलत आहे. मला माहिती आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून भाजपचा आमदार निवडून आणला आहे. त्यामुळे त्यांना भविष्यात जानेवारी-फेब्रुवारीच्या आसपास निश्चित न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.