कराड : यशवंतनगर (ता. कराड) येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकासाच्या कामगिरीची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांच्याकडून सन २०२४-२५ च्या गळीत हंगामासाठी उच्च साखर उतारा क्षेत्रातील तृतीय क्रमांकाचा उत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार कारखान्यास जाहीर झाला आहे. याबाबतचे पत्र नुकतेच प्राप्त झाल्याची माहिती कार्यकारी संचालक विश्वजीत शिंदे यांनी दिली.
प्रेरक स्व. यशवंतराव चव्हाण व संस्थापक पी. डी. पाटील यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, चेअरमन व माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे कामकाज सुरू आहे. कारखान्याने सादर केलेल्या ऊस विकासासंबंधीच्या आकडेवारीचे तज्ज्ञ समितीने मूल्यमापन केले. भारत सरकारच्या मुख्य संचालक (साखर) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुरस्कारासाठी कारखान्याची निवड केली.
कारखान्यास यापूर्वी आर्थिक व्यवस्थापन, तांत्रिक क्षमता, ऊस विकास तसेच पर्यावरणपूरक कामगिरीबद्दल विविध पुरस्कार मिळाले आहेत. हा राष्ट्रीय सन्मान कारखाना प्रशासन व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता नवी दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे केंद्रीय मंत्री व राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे कारखान्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या कामगिरीची राष्ट्रीय पातळीवर दखल; उत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार कारखान्यास जाहीर
by Team Satara Today | published on : 15 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा