सातारा : सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पुढाकार घेऊन महायुतीच्या संदर्भाने बैठक बोलावलेली आहे हे मला प्रसारमाध्यमातून कळाले. महायुतीच्या बैठकीत काय निर्णय होईलहे सांगता येणार नाही, मात्र युती जर झाली नाही तर प्रत्येक जण लढायला मोकळा आहे. प्रत्येक पक्षाची ताकद या जिल्ह्यांमध्ये आहे, असे स्पष्ट प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढवण्या संदर्भात पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका या स्वबळावर की महायुती मधून या प्रश्नावर सातारा जिल्ह्याचे राजकारण सध्या सुरू आहे. यासंदर्भात काय निर्णय होणार याबाबत बोलताना शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम ठेवला आहे तसेच भारतीय जनता पार्टी सुद्धा आपापल्या पद्धतीने मुलाखतींचा कार्यक्रम राबवत आहे.
पालकमंत्री शंभूराजे यांनी आज बैठक बोलावल्याची आमच्याकडे माहिती आहे. या बैठकीला कोणी जायचे याबाबतचा निर्णय सर्वसमावेशक घेतला जाईल मात्र बैठकीत काय ठरेल हे मी सांगू शकत नाही. मात्र एकमत जर झाले नाही तर प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने लढायला मोकळा आहे 'राष्ट्रवादी दोन्ही गट शिंदे गट या सर्व पक्षांचे जिल्ह्यामध्ये आपापल्या पद्धतीने ताकत आहे जो तो आपल्या पद्धतीने लढायच्या तयारीत असून कोणीही थांबायला तयार नाही. त्यामुळे लढती या होणारच आहेत असे ते स्पष्टपणे म्हणाले.
राष्ट्रवादी एकीकरणाच्या संदर्भात बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, कोणी काय करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र भारतीय जनता पार्टीम्हणून आम्हाला आमच्या कामावर विश्वास आहे महानगरपालिका निवडणुकांमध्येदेवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट यश मिळवले आहे तसेच केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातूनही भारतीय जनता पार्टीने सांगली कामगिरी बजावली आहे .सातारा जिल्ह्यातही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी चांगली कामगिरी बजावेल आम्हाला आमच्या विकास कामांवर विश्वास आहे. जिल्हा परिषदेचे मतदार भारतीय जनता पार्टीला कौल देतील असा स्पष्ट विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लेक व्यू हॉटेल येथे होणाऱ्या मुलाखतीला माझ्यासह खासदार उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, अतुल भोसले, मनोज घोरपडे हे सर्व येणार आहेत. भारतीय जनता पार्टीच्या वतीने महायुतीच्या बैठकीला कोणी जायचे याचा समन्वय निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा दोन्ही राजांच्या सहमतीने ठरणार का या प्रश्नात बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढत असतो. त्यामुळे अध्यक्ष पदाचा निर्णय होताना सर्व सहमतीने निर्णय घेतला जाईल.सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण महिला ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. निकालानंतर राजकीय परिस्थिती पाहून सर्व समन्वयाने योग्य तो निर्णय निश्चित घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.