सातारा : महाराष्ट्राच्या विविध पर्यटन क्षेत्रांमध्ये महसूल वाढवण्याची क्षमता आहे. पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने या स्थानांचा आढावा घेऊन आराखडा बनवण्याचे निर्देश पर्यटन महामंडळाला दिले आहेत. याशिवाय महाराष्ट्राचा मोठा पर्यटन महोत्सव महाबळेश्वर-पाचगणी येथे लवकरच भरवला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच तत्कालीन परिस्थितीत जिल्ह्याला विकासासाठी निधी दिला होता, त्याचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. जिल्ह्याच्या आरोग्यव्यवस्थेमध्ये ग्रामीण विकास यंत्रणा तसेच मॉडेल स्कूल, याशिवाय रस्ते बांधणी या कामांकरिता पालकमंत्री असताना 153 कोटी रुपये मी दिले होते, त्याचा आढावा घेतला आहे. मार्च 2025 पर्यंत सातारा जिल्हा परिषदेला दिलेला निधी जास्तीत जास्त खर्च कसा होईल, याकरिता आम्ही दक्ष आहोत. जलजीवन योजना, कोयना भूकंप तसेच आवर्षण काळातील रखडलेली पुनर्वसन प्रक्रिया याचा सुद्धा आढावा घेत संबंधित यंत्रणेला ती कामे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील विविध ठिकाणचे पर्यटन आराखडे बनवण्याचे काम पर्यटन महामंडळाला देण्यात आले आहे. येत्या मार्चनंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा पर्यटन महोत्सव महाबळेश्वर-पाचगणी येथे भरवण्याचे नियोजन आहे. त्या दृष्टीने तपशीलवार कार्यक्रमाची मांडणी व त्यामध्ये वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा समावेश करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणा यंत्रणांना दिल्याचे देसाई यांनी सांगितले.
जिल्ह्यातील पाल व मांढरदेव यात्रेसह विविध ठिकाणच्या आयोजित यात्रांमध्ये कोणतीही गैरसोय होणार नाही व भाविकांची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सातारा शहरातील वाहतूक कोंडीबाबत आपल्या ज्या भावना आहेत, त्या सातार्याचे आमदार व बांधकाम मंत्री आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील, असे एका प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले. याशिवाय पुणे-बेंगलोर महामार्गावरील नागठाणे येथे होणार्या वाहतूक कोंडी संदर्भातही प्रश्न विचारला असता संबंधित अधिकार्यांना या ठिकाणी अंडरपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दृष्टीने वाहतूक कोंडी कमी होईल, असे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री असताना सातार्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचा विषय माझ्याकडे चर्चेला आला होता. या संदर्भात दलित संघटनांनी निवेदन दिले होते. नजीकच्या काळात सामाजिक मंत्र्यांसमवेत याबाबतची एक बैठक लावून भीमाबाई आंबेडकर भवनाच्या स्मारकाचा प्रश्न लवकर मार्गी लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.