मुंबई : राज्यामध्ये पुढच्याच आठवड्यापासून पदभरतीला सुरुवात होणार आहे. गट ब आणि गट क वर्गातील संवर्गांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याबाबत माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करत सांगितलं की, शासन सेवेतील 'गट ब आणि क' पदांसाठीची जाहिरात तत्काळ प्रकाशित करण्यात यावी, यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे मागणी केली होती. आज एमपीएससी अध्यक्षांना मी फोन करून यासंदर्भात विनंती केली. त्यांनी येत्या आठवड्यातच ही जाहिरात काढण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यामुळे इच्छूक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्यात अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली होती. आता पुन्हा राज्य सरकारने गट ब, गट क आणि गट अ वर्गातील पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही दिवशी लागू शकते. त्यापूर्वी भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या अनेक विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदं रिक्त आहेत. सरकार कोणत्या विभागात आणि किती पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणार, हे पुढच्या आठवड्यात स्पष्ट होणार आहे.