सातारा : पाटण तालुक्यातील अतिवृष्टी आणि भूस्खलनग्रस्त ९ गावांतील ५५८ घरकुलांच्या पुनर्वसनासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून निधी उपलब्ध झाला आहे. या घरकुलांचे बांधकाम, नागरी सुविधा, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा उपाययोजनांचे काम डिसेंबर २०२६ अखेर पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात पुनर्वसनासंदर्भातील बैठकीत पालकमंत्री श्री. देसाई यांनी या सूचना केल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
गोकुळ तर्फे पाटण येथे काही घरांचे पुनर्वसन झाले आहे. या ठिकाणी जाण्यासाठी खासगी जागेतून रस्ता आहे. संबंधित जागामालकाशी वाटाघाटी करून हा रस्ता खुला करावा, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, मोडकवाडी-जिंती येथे ८८ घरकुलांचे बांधकाम प्रस्तावित आहे. परंतु त्या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने इतर ठिकाणी जागेचा शोध घ्यावा.
देशमुखवाडी येथे २०० घरकुले बांधण्यात येणार होती, परंतु या ठिकाणी ५७ घरे सुरक्षित जागेत बांधण्यात आली आहेत. उर्वरित घरांसाठी महसूल किंवा जलसंपदा विभागाची जागा पहावी व जागेचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करावा. ज्या ठिकाणी घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे, परंतु पिण्याच्या पाण्याची सोय नाही, अशा पुनर्वसित ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्याचे काम तातडीने हाती घ्यावे.
प्रशासनाने ९ गावांतील ५५८ घरकुले बांधण्याबरोबरच इतर सुविधा देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. तसेच कामाला गती मिळावी यासाठी पाटणच्या प्रांताधिकाऱ्यांनी प्रत्येक आठवड्याला बैठक घ्यावी. या पुनर्वसनाच्या कामात हयगय केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत दिला.