जालना: समृद्धी महामार्गावरील जामवाडी शिवारात आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ट्रकने एका पिकअपला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात सात महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही पिकअप गाडी एका कंत्राटदाराची होती. समृद्धी महामार्गावर गवत काढण्याचे काम करणाऱ्या महिलांना घेऊन जाण्यासाठी ही गाडी महामार्गावर थांबलेली असताना, नागपूरहून येणाऱ्या ट्रकने तिला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पिकअपचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून, अपघातातील मृत महिलांचे साहित्य महामार्गावर विखुरले गेले होते.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. या अपघातातील मृत महिला बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.