सातारा : शहरातील कुपरबाग परिसरात जुन्या वादातून झालेल्या हिंसक हल्ल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमान्वये सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मीटेकडी येथील धीरज प्रदीप धोत्रे (वय 19) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुश्रीत सावंत, अक्षय शिवगण, अविनाश पवार, गोट्या पवार, करण लांदे, फरीद शेख आणि सत्य (आदित्य) सागर यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जुलै रोजी भीमाबाई आंबेडकर चौकात दुचाकीच्या तोडफोडीवरून सुरू झालेला वाद नंतर चिघळला. त्यानंतर काही जणांना मारहाण करण्यात आली आणि एका कारचेही नुकसान करण्यात आले. पुढे फिर्यादी व त्यांच्या सहकार्यांना कुपरबाग परिसरात बोलावून धारदार शस्त्रे, लोखंडी हत्यारे, लाकडी दांडके आणि दगडांच्या साहाय्याने बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले असून काहींना फ्रॅक्चर झाल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार देशमुख करीत आहेत.