सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय संमेलनातील कार्यक्रमांचा आढावा घेऊन स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, संमेलनाला उदंड प्रतिसाद मिळाला. गेल्या चार दिवसात चवळपास आठ लाख साहित्यरसिकांनी भेट दिली याबद्दल मी आभार मानतो. श्री. छ. अभयसिंहराजे भोसले हे ३३ वर्षांपूर्वी सातारा येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद मला मिळाले याचा विशेष आनंद आहे. त्यावेळप्रमाणेच यंदाचेही संमेलन यशस्वी झाले आहे, याचा आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मिळविलेल्या स्वराज्याचा विस्तार छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांच्या काळात अटकेपार गेला. थोरल्या शाहू महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास झाकोळला गेला आहे. आपल्या लेखणीतून छत्रपतींचा देदिप्यमान इतिहास समाजासमोर आणणाऱ्या संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी श्रीमंत छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या कर्तृत्वावरही प्रकाश टाकावा, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला लाभलेला प्रचंड प्रतिसाद पाहता पुढील नाट्य संमेलनाचे यजमानपदही साताऱ्याला मिळावे, अशी मागणी त्यांनी उदय सामंत यांच्याकडे केली. शासनस्तराव्यतिरिक्त मैत्रीच्या भावनेतून संमेलनाला मिळालेल्या सहकार्याबद्दल उदय सामंत यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून पुढील साहित्यिक तसेच नाट्यविषयक उपक्रमांसाठी ‘अर्थपूर्ण’ मैत्री जोपासावी अशी मिश्किल भाषेत टिप्पणी केली.