सांगली : खानापूर तालुक्यातील विटा जवळील रेवणसिद्ध घाटात गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दोन एसटी बसची समोरासमोर भीषण धडक होऊन मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून १५ ते १६ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक एसटी बस विटा येथून भिवघाटच्या दिशेने जात होती, तर दुसरी बस विजापूरहून मेढ्याकडे निघाली होती. रेवणसिद्ध घाटातील वळणावर दोन्ही बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेचा आवाज परिसरात घुमला असून अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमी प्रवाशांना तत्काळ बाहेर काढून विटा उपजिल्हा रुग्णालयात तर काही जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातात बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून मृत आणि जखमींची नेमकी ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पोलीस आणि एसटी प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे.