सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचे थैमान

महाबळेश्वर मध्ये दीडशे मिलिमीटर; जिल्ह्यात 122 मिलिमीटर पावसाची नोंद

by Team Satara Today | published on : 19 June 2025


सातारा : हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍याप्रमाणेच सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 48 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासात महाबळेश्वर मध्ये दीडशे मिलिमीटर, तर गुरुवारी दिवसभरात 19 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणातील पाणीसाठा 28 टीएमसी वर पोहोचला असून उपयुक्त पाण्याची टक्केवारी 25 टक्के इतकी आहे.

भारतीय हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्राला पुढील 48 तासांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. वार्‍याची पश्चिम किनारपट्टीवर आदरणीय स्थिती निर्माण झाल्याने किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रात घाटाच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तसेच वार्‍याचा वेगही अधिक आहे. सातारा जिल्ह्यामध्ये जावली व महाबळेश्वर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. दोन्ही तालुक्यांमध्ये 78 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये महाबळेश्वर तालुक्यात 151 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या पूर्व भागातही पावसाचा जोर कमी असला तरी पावसाची रिमझिम मात्र कायम आहे. जिल्ह्यातील महाबळेश्वर ते तापोळा या रस्त्यावरील झोलाखिंड परिसरात मुसळधार पावसामुळे रस्ताच वाहून गेला. तापोळ्याच्या मुख्य रस्त्याला जोडणार्‍या मार्गावर पाऊस होऊन रस्ता वाहून गेल्याने दोन्ही बाजूची वाहतूक अडकली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे तातडीने दुरुस्ती काम सुरू केले आहे. तरीसुद्धा मुसळधार पावसामुळे या कामांमध्ये व्यत्यय येत आहे. 

सातारा शहरासह तालुका परिसरामध्ये गेल्या 24 तासात 34 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून शहर परिसरामध्ये 21 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून रस्त्यावर पाणीच पाणी होत आहे. शहरातील प्रमुख 27 ओढे पुन्हा एकदा खळखळून वाहू लागले आहेत, तर मंडई परिसरामध्ये पाणी आणि चिखल यांचा राडारोडा झाला आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावर दिवसभर अतिशय संथ गतीने वाहतूक सुरू होती. मुसळधार पावसाचा सातारा शहरातील जनजीवनावर परिणाम झाला असून शासकीय कार्यालय, महाविद्यालय येथे विद्यार्थी-कर्मचारी यांची यथातथा उपस्थिती होती. मान्सून ने शेतकर्‍यांना लागण करण्यासाठी उसंत दिलेली नाही. त्यामुळे पेरणीची कामे खोळंबली आहेत. पुढील 48 तासासाठी सुद्धा हवामान विभागाने जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषत: धरण क्षेत्रातील भागांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कण्हेर धरण परिसरातील विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीकाठाच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पावसाचा जोर लक्षात घेऊन राज्यातील सर्व साकव आणि पुलाच्या बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार सातारा जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर व दक्षिण विभाग या कामाला लागला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यामध्ये जिल्हा महामार्गावर एकूण 34 पूल निर्देशित असून त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल येत्या तीन ते चार दिवसांमध्ये बांधकाम विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाला सादर केला जाईल. याशिवाय साकव पुलांचे तातडीने सर्वेक्षण करून धोकादायक साकव पूल तात्काळ बंद केले जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुढील 24 तास धोक्याचे
पुढील बातमी
संमेलनासाठी माझे 99 रुपये; मी 999 रुपये देणार

संबंधित बातम्या