पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर; १६.९६ लाख शेतकऱ्यांना मिळणार १३,६०० कोटींचा लाभ

by Team Satara Today | published on : 29 July 2026


पुणे : राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही जाहीर केली असून, त्याअंतर्गत शेतकऱ्यांची पहिली यादी 25 जुलैरोजी प्रसिद्ध झाली आहे. यादीत एकूण 16 लाख 96 हजार शेतकरी असून, त्यांच्या कर्जमाफीची रक्कम ही 13 हजार 600 कोटी रुपये आहे.

आजअखेर एकूण चार लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, उर्वरितही लवकरच होईल आणि पुढील आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्यक्षात कर्जमुक्तीची रक्कम जमा होईल, अशी माहिती राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.

सहकार आयुक्तालयात मंगळवारी (दि. 28) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली. या वेळी सहकार विभागाचे अपर आयुक्त व विशेष निबंधक नागनाथ यगलेवाड, जिल्हा उपनिबंधक (पुणे ग्रामीण) प्रकाश जगताप व अन्य अधिकारी उपस्थित होते. तावरे म्हणाले, कर्जमुक्ती योजनेत कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना (ओटीएस) आणि प्रोत्साहनपर लाभ असे तीन घटक आहेत.

कर्जमुक्तीची ही सर्व प्रक्रिया महाआयटीने विकसित केलेल्या संगणकीय पोर्टलमार्फत कार्यान्वित झाली. सर्व शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड किंवा प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीतील विशिष्ट क्रमांक घेऊन ई-सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावे. ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी काढला नाही, त्यांना तो काढावा लागेल आणि नंतरच ही रक्कम बँकेत जमा होईल. दरम्यान, कर्जमुक्तीची दुसरी यादी दोन आठवड्याच्या आत प्रसिद्ध केली जाणार असून, त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एनपीए खात्यावरील मुद्दल, व्याजमाफीचा शेतकऱ्यांना फायदा...

व्यापारी बँकांमधील 6 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या अनुत्पादित कर्जखात्याची (एनपीए) काही मुद्दल रक्कम व व्याजही माफ करून घेण्यास सहकार विभागास यश आले असून, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. गावपातळीवर प्रसिद्ध केलेल्या यादीत अनुत्पादित कर्ज खात्यास निर्देशित प्रमाणात सवलत (हेअर कट) आकारून आलेली तडजोड रक्कम आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे बँकांकडून दि. 1 एप्रिल 2026 नंतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर व्याजाची आकारणी होणार नाही. त्यामुळे प्रसिद्ध यादीतील दोन लाखापर्यंतची कर्जमुक्ती शेतकऱ्यांना मिळणार आहे. दरम्यान, प्रसिद्ध यादीत नाव चुकले, आधार नंबर, बँक खाते क्रमांक चुकला असेल, तर त्यांना तक्रार करता येईल. त्याची दखल घेऊन त्यांना निश्चितपणे कर्जमाफीचा लाभ मिळेल, असेही तावरे यांनी स्पष्ट केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी ‘कोयना’ पायथा वीजगृहातून पाणी सोडणार; ८१.१२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध
पुढील बातमी
ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 'पीएम यशस्वी' शिष्यवृत्ती योजना; शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा

संबंधित बातम्या