सोलापूर : गावातील यात्रेच्या दिवशी मला शेतात पाणी देण्यास का सांगता, असे म्हणत रागाच्या भरात १७ वर्षांच्या मुलाने कासेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. हरिदास अशोक मोरे, असे त्या मुलाचे नाव आहे. रविवारी (ता. ५) सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
हरिदास इयत्ता अकरावीत शिकत होता. रविवारी गावाची जत्रा होती. मात्र, उन्हाळ्यामुळे पिकांना पाणी द्यायचे असल्याने वडिलांनी त्याला शेतात जायला सांगितले होते. ‘पिकांना पाणी देऊन जत्रेला ये,’ असे त्यांनी बजावले होते. पण, गावच्या जत्रेच्या दिवशी शेतात का जाऊ, असे म्हणत तो मित्राची दुचाकी घेऊन शेतात गेला. त्याचा राग पाहून कुटुंबीयांना संशय आला. त्यामुळे वडिलांनी त्याच्या भावाला थोड्या वेळाने शेतात पाठवले. तोपर्यंत हरिदासने शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला होता. हे दृश्य पाहताच त्याच्या भावाने सत्तूरने दोरी कापून त्याला खाली उतरवले आणि लगेचच वडिलांना बोलावून घेतले. त्याला तातडीने सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हरिदासच्या पश्चात आई-वडील, दोन भावंडे व आजोबा असा परिवार आहे.
भविष्यातील एक तगडा पैलवान अशी हरिदासची ओळख होती
मेहनतीने व जिद्दीने लाल माती गाजवणारा, भविष्यातील एक तगडा पैलवान अशी हरिदासची ओळख होती. इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या हरिदासने कुस्तीच्या लाल आखाड्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्याने सलग दोन वर्षे तालुकास्तरावर कुस्तीत विजेतेपद पटकावले होते. गावातील जय हनुमान तालमीत तो दररोज सराव करत होता. त्याची पिळदार शरीरयष्टी आणि कुस्तीतील चपळाईमुळे भविष्यात तो गावाचा नावलौकिक वाढवेल, अशी सर्वांना आशा होती.