सातारा : दिव्यांग व विधवांना 6 हजार रुपये मानधन देण्यात यावे, शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, यासह 17 मागण्यांसाठी दि. 8 जुन पासून बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सातार्यात खिंडवाडी येथे प्रहार अपंग क्रांती तसेच दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था यांच्यावतीने पुणे-बंगलोर अशियाई महामार्ग रोको आंदोलन आज दुपारी 1 वाजता करण्यात आले.
यावेळी अमोल कारंडे, अजय पवार, नामदेव इंगळे, आनंदा पोतेकर, सुरेखा सुर्यवंशी, सागर गावडे, प्रशांत बगले, महेश जगताप, शैलेंद्र बोर्डे, प्रमोद गायकवाड, चंद्रकांत नाळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के आणि सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी मध्यस्थी केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान, फलटण, कराड येथे दि. 13 रोजी मुंडण आंदोलन करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
शेतकर्यांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी, शेतमालाला हमी भावावर 20 टक्के अनुदान देण्यात यावे, दि. 7 एप्रिल 2025 रोजी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावेत, यासह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सातार्यात प्रहार अपंग क्रांती आंदोलन आणि दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था यांच्यावतीने पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन खिंडवाडी येथे करण्यात आले. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी कार्यकर्ते स्वखर्चाने खिंडवाडी येथे दाखल झाले होते.
सातारा पोलीस दलाचे या आंदोलनाकडे लक्ष होते. प्रत्येक कार्यकर्त्यावर पोलिसांची पाळत होती. दिव्यांग कार्यकर्त्यांना फोन करुन त्यांचे लोकेशन तपासले जात होते. दिव्यांगाच्या संघटनांनी खिंडवाडी येथे आंदोलन करण्याचा निर्धार केला होता. त्याच अनुषंगाने चार पोलीस कर्मचारी सातार्यात कार्यालयावर, तर चार पोलीस कर्मचारी वाढे फाटा येथे आणि काही खिंडवाडी येथे, काही शेंद्रे येथील कणसे ढाब्याच्या समोर उभे होते.
दरम्यान, सातारा तालुका अध्यक्ष आनंदा पोतेकर, अमोल भातुसे, दिलखुश गायकवाड, गणेश किर्दत आदी कार्यकर्ते कणसे ढाब्यासमोर जमले. तेथे पोलीस अधिकार्यांनी आंदोलन करु नका, येथे अशी विनंती केली. तोपर्यंत खिंडवाडीत प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हाध्यक्ष अमोल कारंडे, दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार, सागर गावडे यांनी कराड बाजूकडून पुणे बाजूकडे जाणारी लेन अडवली. त्यामुळे पोलिसांनी सर्व वाहतूक सर्व्हीस रोडवरुन वळवली. परंतु तोपर्यंत वाहतुक कोंडी झाली. जोरदार घोषणाबाजी देत तब्बल अर्धा तास आंदोलन सुरु होते. प्रशांत बगले यांनी आक्रमकपणे भाषण केले. दरम्यान, या आंदोलनाची माहिती मिळताच तेथे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे हे पोहचले. त्यांनी विनंती केल्यानंतर आंदोलनकर्ते तेथून उठले. तेथून लॉँग मार्चने सातारा शहराकडे आंदोलनकर्त्यांनी कुच केली. शहरात शिवतीर्थ येथे छ. शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर अभिवादन करुन आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मारला. तेथे आंदोलन तुर्तास स्थगित केले.
यावेळी बोलताना अमोल कारंडे म्हणाले, हे आंदोलन टप्याटप्याने वाढवण्यात येणार असून दि. 13 रोजी फलटण आणि कराड येथे तहसील कार्यालयासमोर मुंढण आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी शेतकर्यांना दिली जात नाही. दिव्यांगांना 6 हजार रुपये पेन्शन दिली जात नाही तोपर्यंत हा लढा लढत राहु, या सरकारला घाईला आणल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी बोलताना दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार म्हणाले, आमदार महोदयांना दोन लाख 80 हजार पगार दर महिना मिळतो. मात्र दिव्यांगांना केवळ दीड हजार रुपये मिळतात. या दीड हजारात दिव्यांग आणि दिव्यांगांचा परिवार कसा जगत असेल? आमदारांच्या फंडातून दरवर्षी 30 लाख रुपयांचा दिव्यांग निधी खर्च करण्यात यावा व त्यातून दिव्यांगांना स्वावलंबी बनवण्यात यावे. तसेच दिव्यांगांना जोपर्यंत महिना सहा हजार रुपये पेन्शन होत नाही. तोपर्यंत आम्ही आमदारांच्या भोवती, गाडीसमोर लोटांगण आंदोलनही करणार आहोत.
या आंदोलनात अमोल कारंडे, अजय पवार, प्रशांत बगले, दिलखुश गायकवाड, अमोल भातुसे, आनंदा पोतेकर, नामदेव इंगळे, गणेश पवार, शैलेंद्र बोर्डे, सागर गावडे, महेश जगताप, प्रमोद गायकवाड, संग्राम इंगळे, सुरेखा सुर्यवंशी, चंद्रकांत नाळे, यांच्यासह जिह्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.