पुणे : मूळ शेतकऱ्याची जमीन कायदेशीररीत्या प्रत्यक्ष कसणाऱ्या शेतकऱ्याचे नाव (कब्जाधारक) २००२पर्यंत सातबाऱ्यावर नोंदविले जात होते; परंतु सातबाऱ्यावरून मूळ मालकाचे नावच गायब होऊन फसवणुकीचे प्रकार होत होते. त्यामुळे सातबाऱ्यावर अशा नोंदी घेणे सरकारने बंद केले. मात्र, शेतकरी इतरांच्या जमिनी कसत असल्याने त्यांचे नाव ‘सात ब’ उताऱ्यावर येणे गरजेचे असल्याने मूळ शेतकऱ्यांचे अधिकार सातबारावर कायम ठेवून कब्जेदार शेतकऱ्याचे तलाठी दफ्तराच्या ‘सात ब’ उताऱ्यावर लावण्यासाठी नवी संगणक प्रणाली विकसित केली जात आहे. त्यामुळे कब्जेदार शेतकऱ्यास अनुदान किंवा कर्ज घेण्यास पुरावा म्हणून ही नोद उपयुक्त ठरणार आहे. परिणामी, मूळ मालकांची फसवणूकही टळणार आहे.
कसणाऱ्याच्या नावाची नोंद बंद
पूर्वी एखाद्या व्यक्तीच्या मालकीची शेती असताना त्यांना नोकरी अथवा काही कारणास्तव ती करता (कसता) न आल्यास शेती पडीक राहायची. त्याला पर्याय म्हणून शेती कोणाला तरी करायला देण्याचा प्रकार सुरू झाला. त्यातून शेती करायला देणाऱ्या मूळ शेतकऱ्यासह कसणाऱ्याचे नाव सातबारा उताऱ्यावर यायला लागले. मात्र, त्यातून मूळ शेतकऱ्यांचेच नाव काढून त्यावर कसणारा शेतकरी स्वतःचा मालकी हक्क सांगत असे. त्यातून मूळ शेतकऱ्याची फसवणूक होत असल्याचे प्रकार आढळले. त्यामुळेच २००२ मध्ये ‘सात ब’ उताऱ्यावर कसणाऱ्या शेतकऱ्याच्या नावाच्या नोंदी बंद करण्यात आल्या होत्या.
कब्जेधारकाचे नाव नोंदविणे शक्य
तलाठी दफ्तरातील गाव नमुना ‘सात ब’ बद्दल फारशी माहिती नसल्याने त्याचा प्रभावी वापर होत नाही. त्यामुळे सातबाऱ्यावर कब्जा अथवा पीकपेरा आपल्या नावाने नोंदवावा, अशी मागणी महसूल; तसेच भूमी अभिलेख विभागाकडे करण्यात येत आहे. त्या मागणीची दखल घेऊनच राज्याच्या महसूल विभागाकडून गाव नमुना ‘सात ब’ साठी स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित केली जात आहे. येत्या रब्बी हंगामात मूळ मालकाशिवाय कब्जेधारकाचे नाव त्या प्रणालीच्या माध्यमातून नोंदविता येणार आहे.
खात्रीनंतरच कब्जेधारकाची नोंद
शेती कसणाऱ्या कब्जेधारकाचे नाव नोंदविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. या अर्जासोबत कब्जा कायदेशीररीत्या धारण केल्याबाबतचे पुरावे सादर करावे लागतील. त्यानुसार तहसीलदार मूळ शेतकरी किंवा जमीनधारक आणि संबंधित कब्जेधारकाला नोटीस काढील. कब्जा कायदेशीर असल्याची खात्री करून अशा शेती कसणाऱ्याचे नाव ‘सात ब’ उताऱ्यावर नोंदविता येईल. ही प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. जमीन कसण्यासाठी भाडेकरार अथवा करारनामाही ‘सात ब’ उताऱ्यावर नोंदवण्यासाठी वापरता येऊ शकेल. त्यात ठरावीक हंगाम किंवा काही वर्षांसाठी शेती करण्यास देण्यात येत आहे अथवा शेती कसली जाणार आहे, असा उल्लेख करून करार करता येणार आहे.
शेतकरी एकत्र येऊन सामूहिक शेती करण्यासाठी ‘सात ब’ हा उतारा त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. महसूल विभागाकडून स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित केली जात आहे. त्या प्रणालीद्वारे आता ऑनलाइन ‘सात ब’ उताऱ्यात मूळ मालकाशिवाय कब्जेधारकाचे नाव नोंदविता येणार आहे. - सरिता नरके,संचालक, माहिती-तंत्रज्ञान विभाग