साताऱ्याच्या पर्यटनाला जागतिक ओळख मिळवणार - पर्यटन मंत्री शंभूराज देसाई; कोयना बॅकवॉटर महोत्सवासंदर्भातील बैठक पार

by Team Satara Today | published on : 06 May 2026


मुंबई : कोयना बॅकवॉटर महोत्सव २०२६ च्या माध्यमातून साताऱ्याच्या पर्यटनाला जागतिक ओळख मिळवून देणार, असा विश्वास पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या दूरदृष्टीतून सातारा जिल्ह्याला जागतिक पर्यटन नकाशावर केंद्रस्थानी स्थान मिळवून देण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात येत आहे त्यापैकी एक म्हणजे कोयना बॅकवॉटर महोत्सव २०२६. 

या पार्श्वभूमीवर आज शासकीय निवासस्थान ‘मेघदूत’, मुंबई येथे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोयना बॅकवॉटर महोत्सव २०२६’ संदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीस पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, उपसचिव संतोष रोकडे, पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक सुशिल पवार यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

साताऱ्यातील महाबळेश्वर – तापोळा – मुनावळे – गाडवली या निसर्गरम्य परिसरात येत्या डिसेंबर महिन्यात हा महोत्सव भव्य, आकर्षक आणि जागतिक दर्जाच्या स्वरूपात आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.


महोत्सवामध्ये टेंट सिटी, विविध जलक्रिडा, हेलिकॉप्टर राईड, ड्रोन व लेझर शो, फ्लोटिंग मार्केट, विद्युत रोषणाई, पारंपरिक खाद्य जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, बगी राईड, कर्निवल परेड, महिला बचत गट स्टॉल, बाल मेळ्यात फन ट्रेन, आकर्षक विद्युत रोषणाई, किल्ले व शस्त्र प्रदर्शन, टेंपल हेरिटेज राईड, योगा सत्रे तसेच घोडे स्वारी यांसारख्या विविध उपक्रमांची मेजवानी पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या उपक्रमामुळे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करताना स्थानिक महिला तसेच युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. तसेच नागरिकांना पर्यटन, संस्कृती आणि वारसा यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होईल.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकारातून साताऱ्यात उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांमुळे या महोत्सवाला विशेष गती मिळणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी एक नवा मानदंड प्रस्थापित करेल, असा विश्वास व्यक्त केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नकाशा वगळल्याप्रकरणी राजघराण्यांतील वंशजांची हायकोर्टात धाव; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल
पुढील बातमी
माजी सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी शिक्षण, नोकरीमधील संधी वाढविण्यासाठी अभ्यास गट नेमणार - माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई

संबंधित बातम्या