सातारा : तारळी धरणावरील ज्या उपसा सिंचन योजनांची कामे अपूर्ण आहेत ती कामे येत्या मे महिन्यापर्यंत पूर्ण करावीत. तसेच ज्या उपसासिंचन योजना पूर्ण कायान्वीत आहेत परंतु तेथील ट्रान्सफॉर्मर चोरीला गेल्या आहेत, अशा ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावेत व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार उपसासिंचन योजनेतून शेतीला पाणी द्यावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री देसाई यांनी तारळी धरणावरील उपसा सिंचन व मोरणा (गुरेघर) धरणांतर्गत सुरु असलेल्या बंदीस्त पाईपालईन कामांचा आढावा घेतला. या प्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जयंत शिंदे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोपें यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
तारळी धरणावरील पूर्ण झालेल्या उपसासिंचन योजनेतून पूर्ण क्षमतेने शेतीसाठी पाणी मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत अशा उपसासिंचन योजनेच्या पहाणी प्रत्येक गावातील पाच शेतकरी घेऊन पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी पुन्हा सर्व्हे करावा. सर्व्हेक्षणात काही दुरुस्ती करावयाच्या आढळल्यास त्या तात्काळ कराव्यात. त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देशही पालकमंत्री देसाई यांनी दिले.
बांबावडे उपसा सिंचन योजना टप्प 2 व तारळे उपसासिंचन योजना टप्पा 2 ची कामे 50 टक्के पूर्ण झाली आहेत. ही कामे येत्या मे महिन्याअखरे पूर्ण करावीत. तसेच नाटोशी उपसासिंचन योजनेची पंप हाऊस दुरुस्तीसह उपसा सिंचन योजनेत काही सुधारणा करावयाच्या असल्या त्या कराव्यात या उपसिंचन योजनेंतर्गत असणाऱ्या शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहचले पाहिजे.
मोरणा (गुरेघर) धरणांतर्गत येणाऱ्या बंदीस्त पाईपलाईनचे काम तातडीने पूर्ण करावे. तसेच ज्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये पाईपलाईन जात आहे अशा शेतकऱ्यांना आर्थिक मोबदल्यासह निर्वाह भत्ता येत्या 15 एप्रिलपर्यंत द्यावा. बंदीस्त पापलाईनच्या कामाला गती येण्यासाठी पोलीस व महसूल विभागाची मदत घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्री देसाई यांनी दिले.