मुंबई : दिवाळीनंतर राज्यात पावसाचे पुनरागमन झाले असून राजधानी मुंबईसह ठाणे, पालघर आणि अन्य जिल्ह्यांमध्ये संततधार सुरू आहे. अशातच आज पुन्हा एकदा हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला असून 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. सकाळच्या सुमारास मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, नाशिक, सातारा आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात पुढील पाच दिवस गडगडाटी वादळे, विजांचा कडकडाट आणि ताशी 30-40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पूर्व-मध्य अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र ईशान्य दिशेने सरकत असल्याने वातावरणात हे बदल होत आहेत.
भारताच्या हवामान विभागाने महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे तेथील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून संततधार पावसाने हजेरी लावली आहे. दिवाळीनंतरही पाऊस बरसत असल्याने नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिला मिळाला. तसंच शहरातील हवेच्या गुणवत्तेतही सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत आज सकाळी ढगाळ आणि धुरकट वातावरण पाहायला मिळाले. शहरातील काही ठिकाणी हलके धुकेही जाणवले.