सातारा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने दरवर्षी 'फटाकेमुक्त दिवाळी' हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविला जातो. यंदाच्या दिवाळीनिमित्त अंनिसकडून 'फटाके नको, पुस्तके घ्या' अभियान राबवले जात आहे. यासाठी विविध शाळांमधून ६ ते १६ वयोगटातील मुलांसाठी अंनिसकडून पुस्तके घेण्याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. तसेच अंनिसकडून प्रकाशित करण्यात आलेली पुस्तके ना नफा-ना तोटा तत्त्वावर विक्री केली जात आहेत.
फटाक्यांना खर्च होणारी रक्कम टाळून ती पुस्तके खरेदी करण्यासाठी मुलांनी वापरावी, यासाठी 'फटाके नको, पुस्तके घ्या' उपक्रम अंनिसकडून राबविला जात आहे. यासाठी विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे तसेच मुख्याध्यापक, शिक्षकांनाही याबाबतीत पुढाकार घेण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे.
मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जाणिवा प्रगल्भ करण्याच्या दृष्टीने अंनिसने यंदा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विषयावर बाल साहित्यांची निर्मिती केली आहे. यामध्ये रंगीत व चित्रमय पद्धतीने पाच पुस्तके काढण्यात आली आहेत. ही पुस्तके ना नफा-ना तोटा तत्त्वावर विद्यार्थ्यांसाठी रु. ५० ला एक पुस्तक याप्रमाणे विक्री केली जात. ही पुस्तके घेण्याबरोबर यंदा दिवाळी फटाकेमुक्त, प्रदूषणमुक्त साजरी करावी तसेच फटाक्यांवर होणारा खर्च टाळून पुस्तके खरेदी करावी, असे आवाहन 'अंनिस'चे कार्यकर्ते सुकुमार मंडपे, हमीद दाभोलकर, वंदना माने, प्रमोदिनी मंडपे, भगवान रणदिवे, प्रकाश खटावकर, हौसेराव धुमाळ,उदय चव्हाण यांनी केले आहे.