लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार : मुख्यमंत्री शिंदे

by Team Satara Today | published on : 11 October 2024


मुंबई : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून राजकारण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने आरोप प्रत्यारोपाचे हल्ले होत आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या योजनांचा पाढा वाचत लाडकी बहीण योजनेसंदर्भात सूचक विधान केलं आहे. ” वेळ आल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवू,” मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले आहे.नवी मुंबईत सिडकोच्या कार्यक्रमात बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले,” लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना 1500 रुपये देत आहोत. शेतकऱ्यांसाठी मोफत वीजबील, युवक प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून तरुणांना सहा ते सात हजार रुपये, मोफत शिक्षण, उच्च शिक्षण राज्य सरकारकडून दिले जात आहे. यासाठी करतो, बघतो, पाहते, कमिटी वैगेरे असे काहीही नाही. थेट डिबीटी. आज राज्य सरकार डिबिटीच्या माध्यमातून पैसे देत आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे.

गेल्या 10 वर्षांतील मोदी सरकारने केलेलं काम आणि मागच्या 50-60 वर्षांतील काँग्रेसच्या राजवटीतील कामांची तुलना करा. मोदी सरकारने केलेल्या कामात भ्रष्टाचाराचा एकही डाग दिसणार नाही. पण ठाकरे सरकारच्या काळात कोविड सेंटर, खिचडी आणि डेडबॉडी बॅगमध्ये भ्रष्टाचार केला. आता तुम्हाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार राहिला नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदेनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

इतकेच नव्हे तर, कोणीही माय का लाला आला, तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. पण या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली तर भविष्यात 1500 चे 2000, अडीच हजार नक्की करू, तेव्हा हात आखडता घेणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. हे जनतेचे पैसे आहेत. पुर्वी हफ्त्यांचे सरकार होतं. पण हे बहिणींच्या खात्यात हफ्ते भरणारे सरकार आहे. असंही शिंदेंनी यावेळी स्पष्ट केले.

पण हे सगळे विरोधक तुमच्या तयार केलेल्या योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तुमच्या खात्यात पैसे येऊ लागले तर तेव्हाही ते बोलले पैसे लवकर काढून घ्या, हे सरकार पैसे देणारे सरकार आहे, घेणारे नाही. ज्या सावत्र भावांनीच खोडा घातला, ते तुमच्याकडे आल्यावर त्यांनाही जोडा दाखवा. आधीच्या सरकारने मेट्रो 3, अटल सेतू, कारशेड, समृद्धी हायवे प्रकल्प बंद केले. पण आपलं सरकार आलं आणि हे स्पीड ब्रेकर काढून आम्ही सर्व कामे सुरू केली. आता आपल्या सरकारचं दोन वर्षातील काम आणि ठाकरे सरकारचं अडीच वर्षातील काम. जनतेच्या दरबारात होऊन जाऊद्या दूध का दूध पानी का पानी, असे खुले आव्हानही एकनाथ शिंदेंनी यावेळी दिले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
काजू, बादाम की आक्रोड पैकी सर्वात शक्तीशाली ड्रायफ्रूट कोणते?
पुढील बातमी
भूपेंद्र यादव यांनी घेतले प्रतापगडच्या तुळजाभवानीचे दर्शन

संबंधित बातम्या