सातारा : शेंद्रे ता. सातारा येथील माळरानावर स्व. भाऊसाहेब महाराजांनी लावलेल्या सहकाररूपी रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना सातारा तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील हजारो शेतकरी आणि कामगार, ऊस तोडणी मजूर यांचे सुखाचे संसार चालवत आहे. कारखाना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि सक्षम झाला असून तालुक्यातील एक मोठी संस्था बनला आहे. शेतकऱ्यांना आर्थिक उभारी देणारा हा कारखाना आज पूर्णपणे सक्षम झाल्याने स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झाले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४- २५ च्या गळीत हंगामाची सांगता शेवटच्या ११ साखर पोत्यांच्या पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी ना. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, व्हा. चेअरमन नामदेव सावंत, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आपल्या कारखान्याने सभासद शेतकऱ्यांची विश्वासाहर्ता मिळवली आहे. उच्चतम दर देण्याबरोबरच गाळपास येणाऱ्या उसाला वेळेत पेमेंट देणारा कारखाना असा आपल्या कारखान्याचा नावलौकिक आहे. कारखान्याच्या प्रगतीमध्ये कामगार, कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा आहे. अडचणीचा काळ असताना अत्यंत नेटके, काटेकोर, नियोजनपूर्ण कामकाज करून कारखान्याने १०८ दिवसात १२.६७ टक्के एवढ्या उच्चतम साखर उताऱ्याने ६ लाख २५ हजार ५२५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. हा हंगाम ऊस पुरवठादार शेतकरी, सभासद यांच्या सहकार्यामुळेच यशस्वी झाला आहे. यापुढेही आपल्या सर्वांचे सहकार्य कायम राहू द्या, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी केले.
व्हा.चेअरमन सावंत यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला कारखान्याचे सर्व आजी, माजी संचालक, अजिंक्य उद्योगातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, कामगार यांच्यासह विविध मान्यवर, अधिकारी, कर्मचारी, कामगार, सभासद आणि शेतकरी उपस्थित होते.