नागपूर : शेतकरी कोणत्याही बँकेचा कर्जदार असो, त्याला कर्जमाफीचा लाभ मिळणारच. राष्ट्रीयीकृत बँक असो की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पीक कर्ज देणाऱ्या प्रत्येक संस्थेचे थकीत कर्ज सरकार माफ करणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कर्जमाफीवरून सुरू असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत मुख्यमंत्र्यांनी शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना शेतकऱ्यांचा संभ्रम दूर केला.
अमरावती रोडवरील लिंगा येथे ४४ एकरातील ७०० कोटी रुपये गुंतवणुकीच्या एक्सियो ॲडव्हान्स इंडस्ट्रियल आणि मॅन्युफॅक्चरिंग पार्कचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. त्यानंतर ते म्हणाले की, विदर्भाच्या औद्योगिक क्रांतीला वेग आला असून, नागपूर लवकरच देशाचे ‘लॉजिस्टिक्स आणि मॅन्युफॅक्चरिंग हब’ म्हणून ओळखले जाईल.
बँकेचा निकष नाही, फक्त ‘शेतकरी हित’ महत्त्वाचे
कर्जमाफी केवळ ठरावीक बँकांसाठीच आहे, अशा वावड्या काही घटकांकडून उठविल्या जात होत्या. यावर मुख्यमंत्री कडक शब्दांत समाचार घेतला. कोणी म्हणतंय राष्ट्रीयीकृत बँकांची माफी होईल, कोणी म्हणतंय जिल्हा बँकांची होणार नाही; पण आम्ही स्पष्ट करतो की, ज्या-ज्या बँकेला पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे, त्या सर्व बँकांकडून घेतलेले २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ होईल. आमचे उद्दिष्ट बँकांना फायदा करून देणे नसून प्रत्यक्ष शेतकऱ्याला कर्जमुक्त करणे हा आहे.
नियमित कर्ज भरणाऱ्यांना ‘बोनस’
थकीत कर्जदारांसोबतच प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जे शेतकरी वेळेवर कर्ज परतफेड करतात, त्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल. यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्यांचाही ५० हजारांचा भार हलका होणार आहे.
जुन्या कर्जमाफीपेक्षा ही कर्जमाफी ‘बेस्ट’
ही कर्जमाफी जुन्या योजनेपेक्षा अधिक प्रभावी आणि पारदर्शक असेल. ३० जूनपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. यासाठी विशेष समिती काम करत असून, लवकरच नियमावली जाहीर केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.