पुणे : मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टी सुरूच आहे. त्यामुळे या भागांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, नाशिक, पुणे-सातारा घाटमाथ्याला सोमवारी 'रेड अलर्ट' तर मुंबई, पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांना मुसळधारेचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. राज्यातील पाऊस ८ जुलैपासून कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार सुरू आहे. प्रामुख्याने मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टी सुरू आहे. उर्वरित भागात मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. सोमवारपर्यंत राज्यात पावसाचा जोर राहणार असून, मंगळवारी पाऊस मध्यम स्वरूपाचा राहण्याचा अंदाज आहे. तर बुधवारपासून पावसाचा जोर पूर्णपणे कमी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
असे आहेत अलर्ट (५ ते ६ जुलै)
रेड अलर्ट : रायगड (६, ७), नाशिक (६), पुणे घाट (६), सातारा (६)
ऑरेंज अलर्ट : पालघर (६, ७), ठाणे (६), मुंबई (६), रत्नागिरी (६, ७), सिंधुदुर्ग (६), नाशिक (७), पुणे घाट (७), कोल्हापूर घाट (७), सातारा घाट (७)